बेरोजगार तरुणांना नशा नको, नोकरी द्या! युवक काँग्रेसचे ‘हल्लाबोल’ आंदोलन

राज्यातील वाढती बेरोजगारी आणि ड्रग्जतस्करीविरोधात युवक काँग्रेसने रविवारी ‘हल्लाबोल’ आंदोलन केले. ‘नोकरी द्या, नशा नको…’, ‘भाजप सरकार हाय हाय…’ अशा घोषणा देत कार्यकर्ते ‘काँग्रेस भवन’ येथून डेक्कनकडे निघाले. मात्र, बालगंधर्व येथे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविले. यावेळी आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते. बॅरिकेड्सवरून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलकांनी घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला.

आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब, महाराष्ट्र युवक अध्यक्ष कुणाल राऊत, प्रभारी अजय चिकारा, सहप्रभारी एहसान खान, कार्याध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रसारमाध्यम विभागाचे सरचिटणीस अक्षय जैन, शहराध्यक्ष सौरभ आमराळे, कुमार रोहित, आनंद दुबे, मेघश्याम धर्मावत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनापूर्वी काँग्रेस भवन येथे सभा झाली. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आंदोलनामागील भूमिका विशद नेते उल्हासदादा पवार, अॅड. अभय छाजेड उपस्थित होते.

उदयभानू चिब म्हणाले, ‘देशात बेरोजगारी आणि नशाखोरी या दोन समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. अदानी यांच्या गुजरातमधील मुंद्रा पोर्टमध्ये हजारो कोटींचे ड्रग्ज पकडले गेले. त्याचे पुढे काय झाले?’ असा सवाल त्यांनी केला.

कुणाल राऊत म्हणाले, आम्ही निवडणुकीत हरलो नाही, आम्हाला हरवण्यात आले आहे. बोगस मतदान करून राज्यात काँग्रेसला हरवण्यात आले आणि हे सरकार सत्तेत आले आहे. आज राज्यात खून, किडनॅपिंग यांसारखे प्रकार वाढले असून, राज्याला बिहारच्या दिशेने घेऊन चालल्याची टीका त्यांनी केली.

यावेळी कार्याध्यक्ष शिवराज मोरे, शहराध्यक्ष सौरभ आमराळे यांचीही भाषणे झाली.

…पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

काँग्रेस भवन येथून युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते घोषणाबाजी करीत डेक्कनच्या दिशेने निघाले होते. आंदोलनकर्ते बालगंधर्व येथे आल्यानंतर पोलिसांनी बॅरीकेटींग करीत त्यांना अडविले. पुढे जाऊ न दिल्याने आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक झाले. आंदोलनकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. पोलिसांच्या आदेशाला झुगारून पुढे जाण्याच्या प्रयत्न करणाऱ्या काही आंदोलकांना पोलिसांनी पकडून व्हॅनमध्ये बसविले. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.