
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचे विवस्त्र फोटो पाठवल्याचे गंभीर आरोप एका महिलेने केले आहेत. या प्रकरणाचे पडसाद अधिवेशनातही उमटले. गोरे यांच्या बदनामीचा कट असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरे यांची पाठराखण केली. तसेच आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना याची माहिती असल्याचा दावा केला होता. त्यावर आता रोहित पवारांनी एक पोस्ट करत कितीही काथ्याकुट करा, आम्ही सत्य समोर आणूच, असा इशारा सरकारला दिला आहे.
एका भ्रष्ट मंत्र्याला वाचवण्यासाठी यंत्रणा कशी घरगड्यासारखी राबते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मंत्री जयकुमार गोरे यांचे प्रकरण.
हे प्रकरण समोर आणणारे पत्रकार तुषार खरातांवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे गुन्हे नोंदवायचे, अटक करायची, एका गुन्ह्यात जामीन मिळताच दुसऱ्या गुन्ह्यात अटक… pic.twitter.com/jqOSEQYDnp
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 26, 2025
या प्रकरणी रोहित पवारांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी अनेक दावे करत सरकारला इशारा दिला आहे. या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, एका भ्रष्ट मंत्र्याला वाचवण्यासाठी यंत्रणा कशी घरगड्यासारखी राबते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मंत्री जयकुमार गोरे यांचे प्रकरण. हे प्रकरण समोर आणणारे पत्रकार तुषार खरातांवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे गुन्हे नोंदवायचे, अटक करायची, एका गुन्ह्यात जामीन मिळताच दुसऱ्या गुन्ह्यात अटक करायची, जेणेकरून पत्रकार एक दोन महिने आतच सडला पाहिजे आणि त्याचे मानसिक खच्चीकरण झाले पाहिजे, हा या सरकारचा कारभार आहे का?
पीडित महिलेच्या वकिलाला हाताशी धरून तिलाच खंडणीच्या गुन्हयात फसवायचे, एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळताच तिचे नाव दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करून पोलीस कस्टडी घ्यायची, तिचा भावनिक आणि मानसिक छळ करायचा, ही सरकारची नवी कार्यपद्धती आहे का? राजकीय नावे घेण्यासाठी आता तर पत्रकार आणि पीडित महिलेवर दबाव टाकला जात असून या दोघांना स्वतःच्या हस्ताक्षरात मंत्री सांगतील ती नावे लिहून देण्यासाठी मकोका लावण्याच्या धमक्या दिल्या जात आल्याची चर्चा आहे, ही आहे सरकारची कार्यपद्धती आणि नवा पॅटर्न.
विशेष म्हणजे तपास अधिकारी अरुण देवकर जो मंत्र्यांच्या अत्यंत जवळचा मित्र आहे त्याच्याविरुद्ध पोलीस विभागाने पीटा कायद्यात (अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा) गुन्हा दाखल करत अटकही केली होती. भ्रष्ट मंत्र्याला वाचवण्यासाठी सरकार अजून किती कुटाणे करणार? पोलिसांवर, यंत्रणेवर दबाव आणून काळे कारनामे लपवता येणार नाहीत. कितीही काथ्याकुट करा, आम्ही सत्य समोर आणूच!, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.