
राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद चिघळला असतानाच आज खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘होमटाऊन’मध्येच दोन गटांत दंगा झाला. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करीत दुपारी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर सायंकाळी दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. या वादावादीने दोन्ही गटांत तुफान हाणामारी झाली. वाद विकोपाला गेल्यामुळे दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आणि गाडय़ा पेटवण्यात आल्या. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही जमावाने दगडफेक केली. यामध्ये 3 पोलीस जखमी झाले आहेत. पोलीस उपायुक्त नचिकेत कदम यांच्यावर कुऱ्हाडीने वार झाले.
औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी आज विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी औरंगजेबाच्या पुतळा जाळण्यात आला. त्यामुळे या भागातील मुस्लीमांनी मोठ्या संख्येने धाव घेत आंदोलकांना जाब विचारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी दोन्ही गटांमध्ये प्रचंड बाचाबाची झाली. हा वाद विकोपाला गेल्यामुळे दोन्ही गट एकमेकांत भिडले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक सुरू केली. त्यामुळे या ठिकाणी परिस्थिती आणखीनच बिघडली. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही गटांना थोपवून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने पोलिसांवरच चाल करीत दगडफेक केली. यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले.
नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता
- पोलिसांनी दोन्ही गटाच्या जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र कुठलाही गट माघार घ्यायला तयार नव्हता.बेभान झालेल्या आंदोलकांनी दिसेल त्या वाहनाला आग लावणे, तोडफोड करण्यास सुरुवात केली.
- आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनादेखील जमावाने घटनास्थळी पोहोचू दिले नाही. अखेर पोलिसांना दंगल थांबवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
- पोलिसांनी दोन्ही गटांता वेगळे करून चिटणीस पार्कपर्यंत नेले. त्यामुळे रात्री उशिरा परिस्थिती काहीशी नियंत्रणात आली असली तरी नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता होती.
असा उसळला हिंसाचार
औरंगजेबाची कबर उखडून टाका या मागणीसाठी आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन झाले. यानंतर नागपूर महाल परिसरात दोन्ही गट आमनेसामने आले आणि एकमेकांवर दगडफेक सुरू करण्यात आली. विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनाचा रोषही एका गटामध्ये होता. त्यामुळे वाद आणखीनच वाढत जाऊन हिंसाचार उफाळला. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरसावलेले पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांवरही जमावाने दगडफेक केली. यामध्ये काही पोलीस, अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले.
- स्थिती आटोक्यात आली असली तरी पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन सुरू केले असून घराघरात जाऊन पोलीस समाजकंटकांना ताब्यात घेत आहेत. यामध्ये 20 हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घरीच थांबा, बाहेर पडू नका
रात्री उशिरा परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी तणाव कायम होता. नागरिकांनी परिस्थिती पूर्ण नियंत्रणात येईपर्यंत घरातच थांबावे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी केले.
फडणवीसांकडून शांततेचे आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शांततेचे आवाहन केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलिसांना सहकार्य करावे, असे फडणवीस म्हणाले.