राज्याच्या राजकारणात खालच्या थरावर जाऊन एकमेकांवर चिखलफेक सुरू; सत्ताधाऱ्यांवर वडेट्टीवारांची सडकून टीका

गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी महायुतीवर सडकून टीका केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडिया माध्यम X वर ट्वीट करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. “खालच्या थरावर जाऊन एकमेकांवर चिखलफेक करण्याचे काम मागील एका आठवड्यापासून राज्याच्या राजकारणात पुन्हा सुरू झाले आहे. आरोप, प्रत्यारोप आणि उणीदुणी सार्वजनिकरित्या काढून महायुतीतील सत्ताधारी नेते मुद्दाम नवीन वादाला तोंड फोडत आहे. ह्यात महाराष्ट्राच्या मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून सत्ताधारी आपले डाव साधून घेत आहे.” अस म्हणत महाराष्ट्रातील मुख्य प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी अधोरेखीत केले.

“प्रत्येक शासकीय विभागात वाढलेला भ्रष्टाचार, रोज कोट्यवधी रुपयांचे शासन निर्णय काढून तिजोरीची सुरू असलेली लूट, वाढलेली कमिशनखोरी, शेतकऱ्यांच्या पिकाला न मिळालेला हमीभाव, महिलांवर होणारे हल्ले, बेरोजगारी हे सर्व प्रश्न दुर्लक्षित होत आहेत. सत्ताधाऱ्यांचा हा तमाशा आपल्या राज्याच्या संस्कृतीला शोभून देखील दिसत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी नेहमी महाराष्ट्राला बदनाम करून महायुतीतील सत्ताधाऱ्यांनी नेहमीच स्वतःचा फायदा करून घेतला आहे… आता ही तोच डाव आहे.” अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर केली आहे.