
राज्यातील विधानसभा निवडणुकानंतर आता विधानपरिषदेच्या 5 जागांसाठीची निवडणूक जाहीर झाली आहे. विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून 27 मार्च रोजी मतदान प्रकिया होणार आहे. त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे विधानपरिषदेवर असलेल्या 5 आमदारांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामध्ये शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी, अजित पवार गटाचे राजेश विटेकर, भाजपचे आमदार प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड या सदस्यांच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होत आहे. आमदार आमशा पाडवी यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ 7 जुलै 2028 पर्यंत आहे. तर राजेश विटेकर यांचा कार्यकाळ 27 जुलै 2030 पर्यंत आहे. प्रवीण दटके यांचा कार्यकाळ 13 मे 2026 पर्यंत आहे. रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर यांचाही कार्यकाळ 13 मे 2026 पर्यंत आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत यांचा विजय झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर निवडणूक होणार आहे.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
10 मार्च ते 17 मार्च अर्ज भरण्याची प्रक्रिया
अर्जाची छाननी 18 मार्च रोजी होणार
20 तारखेला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
27 तारखेला विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान होणार