मिंधे सरकारने दिलेल्या त्रासाचा जनता बरोबर निकाल लावणार; वर्षा गायकवाड यांनी फटकारले

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या मतदारसंघातील एका रस्त्यांच्या दुरावस्थेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत मिंधे सरकारला फटकारले आहे. ”करदात्यांचा पैसा पक्षांतरासाठी वापरून जनतेला जो त्रास दिला जातोय त्याचा हिशोब जनता बरोबर करेल. येत्या निवडणूकीत तुमचा जनताच निकाल लावणार’, असा इशारा वर्षा गायकवाड यांनी मिंधे सरकारला दिला आहे.

वर्षा गायकवाड यांनी धारावीतील अण्णा नगर परिसरातील एका रस्त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या रस्त्यावर खड़्डयांचे साम्राज्य असून संपूर्ण रस्ता चिखलाने भरलेला आहे. या व्हिडीओ सोबत त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ”याला रस्ता खरंच म्हणावा का? काय अवस्था करून ठेवली आहे मुंबईची या खोके सरकारने. तुम्हीच पहा. धारावीमधील अण्णानगर परिसरातला हा रस्ता. पहिलं पालकमंत्र्यांनी बेकायदेशीर हस्तक्षेप करून आम्ही विकास कामांसाठी मागितलेला विकास निधी रखडवला. त्यानंतर तोच निधी गाजर म्हणून दाखवून मुख्यमंत्री आणि त्यांच्या साथीदारांनी पक्षांतरासाठी फिरवला. करदात्यांचा पैसा असाच पक्षांतरासाठी वापरण्यात आला आणि खाल्ला. लोकांच्या हक्काचा विकास खोके सरकारने असा बळकावला. जनता तुमचा बरोबर निकाल लावणार. प्रत्येक त्रासाचा हिशोब घेणार. तुमचा पराभव जनता करणार. मुंबईकर आता भिडणार, आपले हक्क मिळवणार”, अशी पोस्ट वर्षा गायकवाड यांनी शेअर केली आहे.