पंतप्रधानांचे महाराष्ट्र प्रेम बेगडी, हातावर दिली तुरी; अंबादास दानवे यांची टीका

अवघ्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला देशाचा पॉवर हाउस म्हणून संबोधणाऱ्या पंतप्रधानांनी राज्यात त्यांचे सरकार असताना सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राच्या हातावर तुरी दिली आहे. महाराष्ट्राबाबत पंतप्रधानांचे प्रेम हे बेगडी असल्याचे दिसून आले आहे, अशा कठोर शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्राने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पावर परखड टीका केली.

आज सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाचा नव्हे तर बिहार आणि आंध्र प्रदेशाचा अर्थसंकल्प आहे. 5 ट्रेलियनच्या गोलच्या नावाखाली महाराष्ट्राला केंद्राने गोल-गोल फिरवून लांब फेकले आहे. इथल्या जनतेने भाजपला मतदान केले नाही, याचा जणू वचपाच आज केंद्राने काढलेला दिसतोय,अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केलीय. राज्यातील राज्यकर्त्या पक्षांचे तिन्ही कर्णधार आज त्यांच्याच लोकांनी शून्यावर बाद केलेले दिसले, असा टोलाही दानवे यांनी लगावला.