आरक्षणाच्या प्रश्नाचा तोडगा काढण्यासाठी मोदींकडेच जावे लागेल; मर्यादा वाढवण्याचे अधिकार केंद्राच्याच हातात- उद्धव ठाकरे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आरक्षणाचा तोडगा हा पंतप्रधान नरेंद्र मोदीच काढू शकतात, आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहेत. जर केंद्र सरकारने सर्वमान्य असा तोडगा काढला तर त्याला आम्ही पाठिंबा देऊ असे स्पष्ट केले आहे.

”आऱक्षणाबद्दल माझी भूमिका मी संभाजीनगर दौऱ्याच्या वेळी स्पष्ट केली होती. या सरकारने सर्व पक्षीय नेत्यांना बोलवण्याचं नाटक केलं होतं. पण या सरकारचं आरक्षणाचं बिल जेव्हा विधानसभेत मांडलं तेव्हा त्याला आम्ही पाठिंबा दिला होता. पण माझं म्हणनं की राजकारण्यांना बोलवण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं व सर्वमान्य तोडगा काढावा. शिवसेनेचा त्याला पाठिंबा असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”आऱक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. बिहार सरकारने वाढवलेली आऱक्षणाची मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने हटवली. मर्यादा वाढवायची असेल तर लोकसभेतच हा प्रश्न सुटू शकतो. माझे खासदार पाठिंबा द्यायला तयार आहेत. मराठा, ओबीसी, धनगर समाजाच्या नेत्यांनी एकत्र मिळून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जावं. मोदी नेहमी सांगतात की ते पिछडे जाती जमातीचे आहेत. त्यांनी गरिबीतला संघर्षाचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे याबबात मोदीच निर्णय घेऊ शकतील. त्यांनी दिलेला सर्वमान्य निर्णय आम्हाला मान्य असेल. आऱक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत जर सर्वमान्य तोडगा निघत असेल तर आज मी त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे. मराठा समाजाला प्रामाणिकपणाने न्याय मिळावा असं मला वाटतं. तो न्याय त्यांना हे राज्यात हे राज्य कर्ते असताना मिळेल असं वाटत नाही. मी समाजातील लोकांना विनंती करतो इथे एकमेकांशी भांडत राहण्यापेक्षा आपण दिल्लीत जाऊ व पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगू की तुम्ही यावर तोडगा काढा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

”तुम्हाला एकमेकांना लढवून त्यांच्या राजकीय पोळ्या भाजण्याचं स्वप्न भाजप किंवा जो कुणी बघत आहे. त्यांचं ते स्वप्न साकार होऊ देऊ नका. आपण एका आईची, महाराष्ट्राची लेकरं आहोत. समाजा समाजामध्ये वितुष्ठ, जातीपातीत भांडणं लावून महाराष्ट्राची विल्हेवाट लावायचा प्रयत्न करत असतील . त्यांच ते स्वप्न राज्याला घातक आहे. ते होऊ देऊ नका. त्यासाठी सर्वांनी एकत्र या. त्यासाठी शिवसेनेचा सहभाग हवा असेल तर तो द्यायला आम्ही करायला तयार आहे. मी कोणत्याही समाजाला दोष देत नाही. समाजाची लोकं साधी आहेत. त्यांना त्यांचा न्याय हक्क पाहिजे. आऱक्षण हा विषय असा आहे की त्याला काही मर्यादा आखलेल्या आहेत. त्या मर्यादा ओलांडायच्या असतील तर ते केवळ लोकसभेत होऊ शकतं. अडीच वर्ष झाली आमचं सरकार पाडून अजून हे सरकार तोडगा काढू शकले नाही”, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.