नगरच्या बायपास रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच, आठवडाभरात तीन अपघात

नगर शहराबाहेरील बायपास रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असून, निंबळक शिवारात पुलावर रात्रीच्या वेळी दोन मालट्रकची समोरासमोर धडक होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला. या रस्त्यावर गेल्या आठवडाभरातील हा तिसरा अपघात आहे.

हिरा राम (वय 19, रा. बानेर, राजस्थान) असे या अपघातातील मयताचे नाव आहे. बायपास रस्त्यावर निंबळक शिवारात पुलावर दोन मालट्रकची समोरासमोर धडक झाली. त्यातील एका ट्रकमध्ये क्लिनर असलेला हिरा राम हा जागीच ठार झाला. तर, दोन्ही ट्रकचे चालक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.

नगर शहराबाहेरील बायपास रस्त्यावर गेल्या 6 दिवसांतील हा तिसरा अपघात आहे. मागील शनिवारी (दि. 22) सकाळी अरणगाव ते वाळूज बायपास रस्त्यावर मालट्रक व कंटेनरची धडक होऊन दोन्ही वाहनांच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमवारी (दि. 24) पहाटे नेप्ती कांदा मार्केटच्या पुढे नेप्ती शिवारात रस्त्यावरच उभ्या करण्यात आलेल्या कंटेनरवर भरधाव वेगातील आयशर टेम्पो धडकून टेम्पोचालक जागीच ठार झाला होता. तर, बुधवारी (दि. 26) पहाटे निंबळक शिवारात पुलावर दोन मालट्रकची समोरासमोर धडक झाली.

आंदोलनानंतरही सुरक्षेच्या उपाययोजना नाहीत

n बायपास रस्त्याचे काम अद्यापि अपूर्ण असून, या रस्त्यावर कुठे चारपदरी, तर कुठे दोनपदरी वाहतूक सुरू आहे. याबाबत कुठलेही माहितीफलक अथवा वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार संस्थेने केलेल्या नसल्याने बायपास रस्त्यावर अपघात होत आहेत. 15 दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी साइडपट्टय़ा, सर्व्हिस रोड, दिशादर्शक फलक लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार संस्थेने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे उपाययोजना केलेल्या नाहीत.