त्वचेसाठी आणि केसांसाठी वरदान आहेत ‘या’ गोष्टी! केराच्या डब्यात फेकताना जरा जपून..

 

आपल्या आरोग्यासाठी फळे एक उत्तम खजिना आहेत. त्यामुळे नियमितपणे फळांचे सेवन केल्याने अनेक आरोग्य समस्या टाळता येतात. केवळ फळेच नाहीत तर, त्यासोबतच फळांची साले देखील आपल्यासाठी खूप फायदेशीर आहेत. फळांच्या सालींचा योग्य वापर केला तर या साली केसांसाठी वरदान आहेत. फळांची साले आपल्याला निरोगी बनवतात शिवाय त्वचेला ग्लो आणण्यासाठी सुद्धा मदत करतात. केस आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फळांच्या साली कशा उपयोगी आहेत हे आपण पाहुया.

 


चमकदार त्वचेसाठी पपईची साल

पपई ही पचनासाठी खूप फायदेशीर मानली जाते. पपईची साले त्वचेच्या मूलभूत समस्यांपासून (टॅनिंग, कोरडेपणा, जास्त तेल) मुक्त होण्यासाठी उपयुक्त ठरतात. तुम्ही पपईची साल वाळवून मिक्सर किंवा मोर्टारमध्ये बारीक करू शकता. पपईच्या सालीची पावडर बनवताना, ती बारीक वाटून घ्या. जर काही जाड भाग शिल्लक असतील तर ते काढून टाका. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही चाळणीच्या मदतीने पावडर गाळून वेगळी करू शकता.

2 चमचे पपईच्या सालीची पेस्ट ग्लिसरीन किंवा गुलाबपाण्यात मिसळा आणि फेसपॅक म्हणून लावा. पॅक सुकल्यानंतर, साध्या पाण्याने चेहरा धुवा. पपईच्या सालीचा फेसपॅक लावताना लक्षात ठेवा की चेहरा कधीही गरम पाण्याने धुवू नका.

 

 

 


फेस स्क्रबसाठी लिचीची साल
लिचीची साले स्क्रब म्हणून वापरू शकतो. लिचीची साले ही चिवट असतात, त्यामुळे त्यांना सुकण्यास कमी वेळ लागतो. लिचीची साल सुकल्यानंतर ती बारीक करावी. या पावडरमध्ये 1 चमचा बेकिंग सोडा,1 चमचा लिंबाचा रस मिसळा आणि चेहऱ्यावर स्क्रब म्हणून वापरा. आपल्या मानेवरील काळवंडलेल्या भागावर, कोपरावर आणि गुडघ्यांवर लिचीच्या सालीपासून बनवलेले स्क्रब देखील वापरू शकतो. लिचीच्या सालींपासून बनवलेल्या स्क्रबचा परिणाम काही दिवसांतच दिसू लागेल आणि त्वचेतील मृत पेशी निघून जातील.

 

 


रताळ्याच्या सालीपासून हेअर मास्क 
केस गळतीचा त्रास असलेल्यांना रताळे खाण्याचा सल्ला दिला जातो. केस गळतीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपण रताळ्याचा वापर करु शकतो. तसेच रताळ्याच्या सालीचा वापर करून हेअर मास्क देखील बनवू शकतो. रताळे सोलल्यानंतर त्यात अंड्याचा पांढरा भाग चांगला मिसळून घ्यावा. ही पेस्ट केसांना लावावी. पेस्ट पूर्णपणे सुकल्यानंतर केस साध्या पाण्याने धुवावेत. आवडत असल्यास रताळ्याच्या सालीची पावडर सुकवून साठवून ठेवावी. रताळ्याची साल वाळवताना कमी सूर्यप्रकाश असायला हवा. तेजस्वी सूर्यप्रकाशात साले वाळवली तर त्यातील पोषक घटक नष्ट होतील. रताळ्याच्या सालीमध्ये असलेले व्हिटॅमिन ए केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)