धरणातले पाणी तळाला गेले; कोपरगावला दहा दिवसांआड पाणी पुरवठा होणार

नाशिक धरण परिक्षेत्रात पावसाने ओढ दिली आहे. तसेच यंदा उन्हाच्या झळा वाढल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले आहे. त्यामुळे नाशिकच्या एकूण 23 धरणात केवळ 2759.01 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणी शिल्लक आहे. आता पाण्याचे नियोजन कसे करायचे असा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे कोपरगाव शहराला होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आठ दिवसऐवजी दहा दिवसांनी होणार आहे.

कोपरगाव पालिकेने नागरिकांना याबाबत माहिती दिली आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने धरणातील पाणीसाठा कमी झालेला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागामार्फत पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना आहेत. डाव्या कालव्याद्वारे येणारे आवर्तन उशिरा सोडणार असल्यामुळे पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी 30 जूनपासून पाणीपुरवठा 10 दिवसाआड करण्यात येणार आहे. नागरीकांनी पाणी जपून वापरावे, आपल्या भागात असलेल्या विंधन विहीरीचा पाण्यासाठी वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत धरणातील पाणी साठ्यावरच अवलंबून राहवे लागत आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणाचा पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. धरणांतील जलसाठ्याचे घटते प्रमाण सध्या चिंतेचा विषय बनला आहे. सध्या नाशिकमधील धरणांमध्ये 5.47% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. जवळपास सर्वच धरणांतील साठा निम्म्याहून कमी झाला आहे असे पाटबंधारे खात्याने म्हटले आहे.

आतापर्यंत कोपरगावला 103 मिलिमीटर ब्राह्मणगावला 138 मिलिमीटर पढेगाव 25 मिलीमीटर, शिर्डीला 119 मिलिमीटर राहत्याला 117 मिलीमीटर नाशिकला 186 मिलिमीटर इतकाच पाऊस पडला आहे. राज्यातील चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घोटी इगतपुरीला पाऊस शून्य टक्के आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदी पात्रात 1283 क्यूसेक्स पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे यंदा जुलै महिन्यातही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.