कल्याण रिंग रोडचा मार्ग मोकळा, अटाळीमधील 118 घरांवर हातोडा; बाधितांचे करणार पुनर्वसन

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून बाह्यवळण रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. रस्त्यात बाधित होणाऱ्या अटाळीमधील 118 घरांवर हातोडा टाकला जाणार आहे. या सर्व बाधितांचे पुनर्वसन केले जाणार असल्याने यामुळे कल्याण रिंगरूटचा मार्ग मोकळा होणार आहे.

कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूककोंडी फोडण्याबरोबरच शहरातील कोणत्याही व्यक्तीला कमीत कमी वेळेत शहराबाहेर पडणे शक्य व्हावे यासाठी रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. केडीएमसीमधील रिंग रोडचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून केले जात आहे. रिंग रोड रस्त्यामधील बाधितांना मोबदला, पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघत नसल्याने या रिंग रोडचे काम रडतखडत सुरू आहे. रिंग रोड चार ते सातमधील टप्पा क्रमांक पाचचे काम शिल्लक आहे. कल्याण ते टिटवाळा या 4 ते 7व्या टप्प्यातील रिंग रोड रस्त्याच्या कामात बाधित होणाऱ्या बांधकामामुळे रस्त्याचे काम रखडले होते. या बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यात आता केडीएमसीला यश आले आहे.

रिंगरोडच्या टप्पा क्रमांक 5 मध्ये अटाळी येथील 565 बांधकामे बाधित होत आहेत. यातील 319 घरे यापूर्वी तोडण्यात आली आहेत. केडीएमसीच्या पथकाने आज उर्वरित 118 घरांवर तोडक कारवाई सुरू केली. याबाबत केडीएमसीचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी सांगितले की रूमधारकांचे पुनर्वसन महापालिका आहे. या ठिकाणची उर्वरित बांधकामेदेखील लवकरच निष्कसीत करत या मार्गातील अडथळे दूर करत कल्याण ते टिटवाळादरम्यानच्या रस्त्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

बीएसयूपी योजनेतील घरे मिळणार

टिटवाळा 27 गावांसह डोंबिवली जोडणाऱ्या या रस्त्यातील अडथळे काढत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. बाधितांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे. या सर्व बाधितांचे पुनर्वसन बीएसयूपी योजनेतील घरांमध्ये करण्यात आल्याचे पालिका उपायुक्त गणेश बोरकर यांनी सांगितले.

कल्याण-टिटवाळा फक्त 20 मिनिटांत

बाधितांचे पुनर्वसन केले जाणार असल्याने आता रिंगरूटला होणारा विरोध मावळला आहे. त्यामुळे दुर्गाडी ते टिटवाळा मार्ग दृष्टीक्षेपात आला आहे. या मार्गातील अटाळी येथील रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण ते टिटवाळा हे अंतर अवघ्या वीस मिनिटांवर येणार आहे. यामुळे हा रस्ता तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे.