
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पाचवा आरोपी साठ दिवस उलटूनही सापडत नाही. परंतु, एका नेत्याच्या घरातून मुलगा गायब झाल्यावर सर्व यंत्रणा सक्रिय होते. बारावीची परीक्षा असताना न्यायासाठी वणवण फिरणाऱ्या देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत का, असा संतप्त सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
इंदापूर दौऱ्यावर असताना सुळे यांना सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या, ‘राजकीय नैतिकतेच्या आधारे सगळे पक्ष एकत्र येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, आत्ताच्या घडामोडींमुळे वाईट वाटले.’ कृषिमंत्री कोकाटे यांच्या एक रुपया भिकारीसुद्धा घेत नाही यावर त्या म्हणाल्या, ‘इतके असंवेदनशील सरकार पाहिले नाही. तसेच बीड जिल्ह्यात डीपीडीसीची पाच वर्षांमधील कामकाजाची आणि मंजूर कामांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.’