वक्फ सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालनंतर आसाममध्ये हिंसाचार, दगडफेकीनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज

वक्फ सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादनंतर आज आसाममध्येही विविध ठिकाणी हिंसाचार उफाळून आला. कछर जिल्ह्यात जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. सिलचर शहरातील परिस्थिती चिघळू नये म्हणून आणि जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला. या झटापटीत काही पोलीस आणि नागरिकही जखमी झाले.

सिलचरमध्ये चामरागुडा, बेरेंगा आणि ओल्ड लखीपूर येथे आंदोलकांनी वक्फ कायद्याविरोधात आज सकाळी रॅली काढली. आंदोलनकर्त्यांनी वक्फ सुधारणा कायद्याला विरोध करणारे फलक हाती घेतले होते. कायदा इस्लामविरोधी असून जर तो रद्द केला गेला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

हिंसाचाराला भाजप जबाबदार

वक्फ सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार उफाळून आला. यात तिघांचा मृत्यू झाला. या हिंसाचाराला भाजप जबाबदार आहे.  वक्फ सुधारणा कायदा आम्ही नाही पेंद्र सरकारने बनवला. त्यामुळेच देशभरात त्याला कडाडून विरोध होत आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना पेंद्र सरकारनेच उत्तर द्यायला हवे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. वक्फ कायदा कुठल्याही स्थितीत पश्चिम बंगालमध्ये लागू होऊ देणार नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

वक्फ कायद्यांतर्गत पहिली कारवाई; मध्य प्रदेशात अनधिकृत मशिदीवर हातोडा

वक्फ सुधारणा कायदा देशभरात लागू झाल्यानंतर या कायद्यांतर्गत मध्य प्रदेशच्या पन्नू जिह्यात अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यात आली. प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी अखेर मदरशाच्या संचालकांनीच मशिदीवर स्वतःहून बुलडोझर चालवत मशीद पाडून टाकली. पन्ना जिह्यातील बीड कॉलनी येथे सरकारच्या जागेवर गेल्या 30 वर्षांपासून कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता हा मदरसा सुरू होता अशी तक्रार राज्य सरकारकडे करण्यात आली होती. एका स्थानिक मुस्लिम रहिवाशाने केलेल्या तक्रारीनंतर यंत्रणांनी या मदरशाची दखल घेतली होती.

मुर्शिदाबादमधील हिंसाचारप्रकरणी आणखी 12 जणांना अटक

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिह्यात वक्फ (दुरुस्ती) कायद्यावरून झालेल्या हिंसक निदर्शनांच्या संदर्भात आज आणखी 12 जणांना अटक करण्यात आली. हिंसाचार उफाळल्यामुळे तीन जणांना जीव गमवावा लागला. आज मुस्लिमबहुल जिह्यात तणावपूर्ण शांतता होती, कुठेही हिंसाचाराची घटना घडली नाही, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हिंसाचारामुळे मुर्शिदाबादच्या धुलियान येथील जवळपास 500 लोकांनी इतरत्र स्थलांतर केले. सर्वांनी नदी पार करून माल्दाच्या वैष्णवनगर येथील एका शाळेत आसरा घेतल्याचे वृत्त आहे.