सरकारच्या शिष्टमंडळासमोर आंदोलनकर्त्यांची घोषणाबाजी, मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याची लक्ष्मण हाकेंची भूमिका

ओबीसी आरक्षणासाठी जालन्यातील वडीगोद्रीत येथे लक्षण हाकेंचे गेल्या 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. शुक्रवारी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह सरकारचे एक शिष्टमंडळ जालन्यात हाकेंची भेट घ्यायला गेले होते. मात्र यावेळी आंदोलनकर्त्यांनी ओबीसी आरक्षणासाठी घोषणाबाजी केली व जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही व त्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका लक्ष्मण हाके यांनी घेतली आहे. लक्ष्मण हाकेंनी उपोषण सोडण्यास नकार दिल्यामुळे आता सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे.

”आम्ही गेले 8 ते 9 दिवस प्रसारमाध्यमांच्याद्वारे सरकारकडे आमची भूमिका मांडत आलोय. सरकार म्हणते ओबीसी आऱक्षणाला धक्का लागणार नाही. दुसरीकडे मराठा आंदोलक म्हणतात ते ओबीसी आरक्षणात घुसलेले आहेत. तर या प्रश्नांची योग्य उत्तर सरकारने देणे अपेक्षित आहे. जरांगे किंवा सरकार यापैकी कोणीतरी खोट बोलतंय. त्यामुळे ग्रामीण भागातील ओबीसी किंवा इतर छोटे समाज यांचे पुढे काय होणार याचं निदान होणे गरजेचे आहे. सरकारने फक्त ठराविक समाजाकडे लक्ष न घालता इतर 12 कोटी लोकांचा सारासार विचार करून निर्णय द्यावा, अशी मागणी यावेळी हाकेंनी केली.

सरकारने कोणत्याही शासकीय प्रतिनिधी मार्फत किंवा इथल्या तहशीलदारामार्फत तुम्ही लेखी निवेदन द्यावे. आमच शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला येईल मात्र आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर मिळावी. जर तसे झाले नाही तर हे आमचे उपोषण असचं चालू राहिल. असा इशारा लक्ष्मण हाकें यांनी सरकारला दिला.

सरकारतर्फे राज्याचे मंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे, उदय सामंत, गोपीचंद पडळकर यांनी उपोषण स्थळी जात हाके यांची भेट दिली आहे.