
चंद्रपूर शहरालगत असलेल्या पडोली येथील मुख्य चौकात मालवाहू ट्रक उभे असल्याने अपघाताला ते कारणीभूत ठरत आहेत. चंद्रपूर-नागपूर या मुख्य महामार्गावरच हे ट्रक उभे केले जात असल्याने रोज या चौकात अपघात होत आहेत. एसटी महामंडळाची एक बस अशाच एका ट्रकला रात्री धडकल्याने बसचा वाहक जागीच ठार झाला, तर 13 प्रवासी गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे पुन्हा एकदा या मार्गावरील हा गंभीर प्रश्न समोर आलाय.
विशेष म्हणजे याच चौकात पोलिस ठाणे आहे. पण ट्रान्सपोर्ट मालकांशी स्नेहाचे संबंध असल्याने या ट्रकवर कारवाई केली जात नाही. रात्रीच्या अपघातानंतर आज सकाळी स्थानिक नागरिकांनी ट्रकचालकांना आपल्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण वेळीच ठाणेदार पोहोचल्याने पुढील वाद मिटला. दोन दिवसांपूर्वी याच चौकात राख भरलेला ट्रक उलटला. त्यामुळे चौकात सर्वत्र राख पसरली आहे. त्यावरून वाहने गेली की राख उडते आणि धुके पडल्यासारखे चित्र निर्माण होते. या धुळीने समोरचे वाहनही दिसत नाही. अजूनही ही राख उचलण्यात आलेली नाही. चौकातील दुकानदार, स्थानिक नागरिकांना याच त्रास सहन करावा लागत आहे.
मृत वाहकाच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत द्या
रस्ता व्यापून उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकचा प्रश्न निकाली काढला गेला नाही तर, अपघातांची मालिका अशीच सुरू राहील. दरम्यान, एसटी कामगार संघटनेने आज बसस्थानकात आंदोलन करीत मृत वाहक संदीप वनकर याच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत द्यावी अशी मागणी केली आहे. अन्यथा एकही बस आगारातून सुटणार नाही, असा इशारा संघटनेने दिला.
संदीप बनकर या वाहकाच्या मृत्यूनंतर आज सकाळपासून चंद्रपूर एसटी आगारात वाहक चालक व कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला आहे. मृत वाहकाला 50 लाखांची नुकसान भरपाई द्यावी व राखेच्या टँकरच्या कंपनी विरोधात विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. जोवर या दोन्ही मागण्या पूर्ण होत नाही तोवर चंद्रपूर आगारातून कुठलीही एसटी बाहेर न पडू देण्याचा इशारा संपकऱ्यांनी केला आहे.