
हंगामातील हरभरा ज्वारीची काढणी झाल्यानंतर बाजारात विक्रीसाठी आणला जात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या घरात माल आल्यानंतर भावात घसरण होत असल्याचे याही वर्षी पुन्हा एकदा पहावयास मिळत आहे. सध्या तूर, हरभऱ्याची आवक वाढली आहे. तूर ४ हजार रुपये, हरभरा ५०० रुपयांनी खाली आले आहेत. शेतकऱ्याचे पिवळे सोने म्हणजे सोयाबीनचे दर एक हजार रुपयांनी खाली आले आहे.
मंठा तालुक्यातील महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीने यंदा कंबरडे मोडले उत्पादन खर्च ही निघणे मुश्किल झाले. इतका निचांकी दर सोयाबीनला मिळत आहे. भरीस भर म्हणजे सरकारने सोयाबीन खरेदी बंद केल्याने खुल्या बाजारात हरभरा, सोयाबीन, तूर, ज्वारी या शेतकरी धान्याचे गेल्या दहा ते बारा वर्षांतील निचांकी दर गाठले. या दहा ते बारा वर्षांत पेरणीचे दर गगनाला भिडलेले असताना पीक काढणीचा हंगाम जवळ आला की सरकार बाहेर देशातील शेती माल आयात करते. त्यामुळे या पिकांचे दर घसरले जातात.
बाहेर देशातील चना, तूर, पाम तेल, सोयापेंड, आयात केल्यामुळे हमीभावापेक्षाही खुल्या बाजारात कमी दर मिळू लागला आहे. दहा वर्षांपूर्वी जेवढा दर मिळत होता. त्यापेक्षाही कमी भाव खुल्या बाजारात शेतकऱ्याच्या पदरात पडतो. अजूनही शेतकऱ्याकडे सोयाबीनसह तूर पडून आहे. खुल्या बाजारात सोयाबीन ३ हजार ८००, हरभरा ५ हजार, तूर ६ हजार ८००, ज्वारी अडीच हजार रुपये, गहू तीन हजार रुपये यापुढे दर मिळत नाही. गेल्या दहा वर्षांपासून खत कीटकनाशके तपासली तर ते दरवर्षी वाढत जाऊन जीएसटीसह दर गगनाला भिडले असल्याने शेतीचा उत्पादन खर्च वरचेवर वाढतोय.