
चैत्री यात्रा कालावधीत भक्तांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचे दान केले असून सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले. मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, पुजा, फोटो विक्री आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून 2 कोटी 56 लाखाचे उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीच्या व्यवस्थापकांनी दिली.
चैत्री यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक आले होते. चैत्र शुध्द 01 (दिनांक 30 मार्च) ते चैत्र शुध्द 15 (दिनांक 12 एप्रिल) या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ 25,59,092 रुपये अर्पण, 63,99,779 रुपये देणगी, 26,21,000 रुपये लाडू प्रसाद विक्री, 34,34,708 रुपये भक्तनिवास, 29,22,100 पुजेच्या माध्यमातून, 64,85,204 रुपये हुंडीपेटी, 16,4,774 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच फोटो, महावस्त्रे, शेणखत, गोमुत्र, मोबाईल लॉकर, जमा पावती, चंदन आदी माध्यमातून 10,68,398 रुपये उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आहे.
मागील वर्षी 26,10,396 रुपये देणगी, लाडूप्रसाद विक्रीतून 19,06,000, भक्तनिवास 75,2,298 रुपये, 21,000 रुपये पुजेच्या माध्यमातून, 46,84,124 रुपये हुंडीपेटीतून, 8,9259 रुपयाचे सोने-चांदीचे दागिणे अर्पण, तसेच फोटो, महावस्त्रे, शेणखत, गोमुत्र, मोबाईल लॉकर, जमा पावती, चंदन आदी माध्यमातून 26,10,711 रुपये प्राप्त झाले होते. तथापि, मागील वर्षी श्रींच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने, दिनांक 15 ते 21 एप्रिल, 2024 या चैत्री यात्रा कालावधीत पहाटे 5.00 ते रा.11.00 पर्यंत फक्त मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात आले होते.
सन 2024 च्या चैत्री यात्रेत रू. 1,26,73,788/- व या वर्षीच्या यात्रेत रू. 2,56,55,055/- इतके उत्पन्न प्राप्त असून, मागील यात्रेच्या तुलनेत रू.1,29,81,267/- इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या मिळालेल्या दानातून श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना पुरेशा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील, असे यावेळी श्रोत्री यांनी सांगीतले.