Sindhudurg News – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास महाराष्ट्राचा फायदा होईल – वैभव नाईक

महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहाणं, यात काही मला कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही, असे मनसे नेते राज ठाकरे एका मुलाखतीत म्हणाले. शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी उत्तर दिले. यावर मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवून एकत्र येण्याचं आवाहन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास महाराष्ट्राचा फायदा होईल, अशी प्रतिक्रिया माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

दरवेळी निवडणुका आल्या की सत्ताधारी पक्षाचे नेते नेहमीप्रमाणे राज ठाकरे यांना भेटतात, त्यांचा वापर करून घेतात. त्यानंतर त्यांचा वापर करून बाजूला करतात. त्यामुळे मनसे नेते राज ठाकरे यांनी आपल्याला कोणाविरुद्ध लढायचे आहे? कोणासाठी लढायचे आहे? हे निश्चित केले पाहिजे. जर ठाकरे बंधू एकत्र आले तर, महाराष्ट्राचा निश्चितच फायदा होईल. पक्षाचा किती फायदा होईल हे माहित नाही. मात्र, मराठी माणसाचा फायदा होईल, असे वैभव नाईक पुढे म्हणाले.