‘एसंशि’ने स्वत:चे खिसे भरले, पण रस्त्यात माल भरला नाही; आदित्य ठाकरे यांचा हल्ला

मुंबईतील रखडलेल्या रस्त्यांवरून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आज आक्रमक झाले. ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत आणि कामं बंद आहेत. त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत, असे सांगतानाच त्यांनी महायुती सरकार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ‘एसंशि’ने खिसे भरले पण रस्त्यांमध्ये माल भरला नाही, असा जोरदार हल्ला त्यांनी चढवला.

आदित्य ठाकरे यांनी आज वरळी मतदारसंघात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रखडलेल्या रस्त्यांच्या कामांवरून भाजप-मिंधे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्य सरकारच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या पालिकेच्या प्रशासक राजवटीत मुंबई लुटण्याचे काम झाल्याचे ते म्हणाले. हा घोटाळाच सरू असल्याचे आपण 2023 -24 मध्येच सांगितले होते. महापालिकेतील अधिकारी काम करतात पण काँन्ट्रक्टर पळून जातात. 15 जानेवारी 2023 ला मी रस्त्याचा घोटाळा समोर आणला होता. 2024 चं टेंडरही तसंच होतं. आताही अधिवेशनात नगरविकास मंत्री पाच मिनिटांत बैठकीतून पळून गेल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपच्या सत्तेत महापुरुषांचा अवमान

कोरटकरच्या जामिनामुळे स्पष्ट झालंय की, भाजप सत्तेत असताना काहीही बोललेलं चालू शकतं. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे तसेच आवडते असल्यामुळे हे सर्व चालतंय. यातून त्यांनी देशाला एक मेसेज दिलाय की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आदी महापुरुषांचा अवमान करू शकता. कारण सत्ता भाजपची आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण असलयामुळे महागाई, टॅरिफ, अर्थव्यवस्थेवर बोलायचं सोडून फक्त हिंदू मुस्लिमावर चर्चा सुरू आहे. ठाण्यातील कोपरी पूल सहा महिन्यांत फुटायला लागलाय. जशी ‘एसंशि’ गटाची क्वालिटी तशीच रस्त्याची क्वालिटी झालीय!

– आदित्य ठाकरे