एककलमी मानसिकतेने झपाटलेल्या राज्यकर्त्यांकडून चर्चेची अपेक्षा करणं चुकीचं, शरद पवार यांची टीका

देशभरात आजपासून तीन नवे गुन्हेगारी कायदे लागू झाले आहेत. हे कायद्यांचे बिल गेल्या अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनात मंजूर करण्यात आले. मात्र जेव्हा हे कायदे पास झाले तेव्हा दोन्ही सदनातील तब्बल 150 खासदारांना निलंबीत करण्यात आले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार संसदेत नसताना हे कायदे मंजूर करून घेत सरकारने एकप्रकारे मनमर्जी केल्याचे दिसून आले आहे. आज हे कायदे देशभरात लागू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी त्यावरून सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे.

”देशाच्या कायदा सुव्यवस्थेतील बदल हा देशाच्या विरोधी पक्षातील 150 खासदारांना निलंबित करून करण्यात आला ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. या बदलात चर्चा आणि सूचनांचा अभाव दिसून येतोय. यासह देशाच्या सुरक्षा यंत्रणेवर येणारा ताण अधिक ठळक होतोय. काळानुरूप बदल होणं गरजेचं असलं तरी यात पारदर्शकता आणण्यासाठी चर्चा घडवून अधिक ठोस पावलं उचलता येऊ शकली असती. मात्र एककलमी कार्यक्रम राबवण्याच्या मानसिकतेने झपाटलेल्या राज्यकर्त्यांकडून चर्चेची अपेक्षा करणं चुकीचं ठरेल”, असे शरद पवार म्हणाले.