राज्यात काही ठिकाणी परिस्थिती बिघडली आहे, सत्तेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात सरकारने सक्त भूमिका घ्यावी; शरद पवार यांनी टोचले कान

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बारामतीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून महायुती सरकारचे कान टोचले. सत्तेचा गैरवापर आणि जाती-धर्मातील अंतर वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकडे सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये, असा टोला शरद पवार यांनी लगावला. बीडची आताची जी अवस्था आहे ती यापूर्वी कधीही नव्हती, असेही शरद पवार म्हणाले.

विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हे अमरावती, यवतमाळ आणि मराठवाड्यात बीड अशा काही जिल्ह्यांच्या संबंधी जी माहिती मिळतेय ती चिंताजनक आहे. आम्हाला याची थोडीफार माहिती कळल्यावर आम्ही ठिकठिकाणची माहिती एकत्रीत करतोय. आणि केंद्र सरकारने याबद्दल एखादं धोरण आखावं, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काही नीती ठरवावी, हा आग्रह आम्ही धरणार आहोत. सोमवारी संसदेचं कामकाज सुरू झाल्यावर या प्रश्नाकडे लक्ष वेधलं जाईल, असे शरद पवार म्हणाले. राज्यात गेल्या वर्षी विदर्भ, मराठवाड्यात 2706 शेतकऱ्यांनी आमहत्या केल्या. सर्वाधिक आत्महत्या या अमरावती विभागात झाल्या आहेत. यावर विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मला बाहेर बोलायचीही आता चोरी झालीय

राज्यात सरसकट वातावरण बिघडलं आहे, असं काही मी मान्य करणार नाही. पण काही ठिकाणी परिस्थिती थोडी बिघडली आहे. सत्तेचा गैरफायदा घेणारे काही घटक आहेत. त्याविरोधात राज्य सरकारने सक्त भूमिका घ्यावी. सत्तेचा गैरवापर आणि लोकांमध्ये जात आणि धर्म यातील अंतर हे कोणी वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर राज्य सरकारला बघ्याची भूमिका घेता येणार नाही, असे म्हणत शरद पवार यांनी महायुती सरकारचे कान टोचले.

राज्यात महिला अत्याचार आणि जनरल क्राईमचे प्रमाण वाढले – सुप्रिया सुळे

“आज जी बीडची अवस्था आहे ती कधीही नव्हती”

बीड जिल्हा अनेक वर्षांपासून बघतोय. आज जी बीडची अवस्था आहे ती कधीही नव्हती. बीड शांत, संयमी आणि सगळ्यांना घेऊन लढणारा जिल्हा असा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. मी स्वतः त्या भागात जाऊन लक्ष देत होतो. तिथे मी उभे केलेले सहा-सहा सदस्य आमदार म्हणून तिथून निवडून आलेले. तेव्हा एक प्रकारचं सामंज्यस्याचं वातावरण होतं. दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचे दुष्परिणाम गेले काही महिने आज बीडमध्ये आपल्याला दिसताहेत. राज्य सरकारने कोण आहे याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेतो, वातावरण खराब करतो अशांच्या संबंधी अत्यंत सक्त धोरण हे आखण्याची गरज आहे. आणि बीडला पूर्वीचे वैभवाचे दिवस कसे येतील, याची काळज घ्यावी, असे शरद पवार म्हणाले.