सहआरोपींना मुख्यमंत्र्यांनी वाचविले, देशमुख हत्याप्रकरणी मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप

‘परळीतील ज्यांच्या कार्यालयात खंडणी आणि संतोष देशमुख यांच्या खुनाचे नियोजन झाले, त्या मंत्र्यांना सहआरोपी केले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना वाचविले,’ असा आरोप मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज केला.

जरांगे यांनी मुळशी तालुक्यातील नेरे येथे पत्रकारांशी संवाद साधला. जरांगे म्हणाले, ‘संतांची भूमी असलेला बीड जिल्हा बदनाम झाला आहे. राजकीय स्वार्थासाठी गुंड टोळ्यांच्या माध्यमातून खून केले जात आहेत. सत्तेतून पैसा, संपत्ती कमावणे यामुळे बीड जिल्ह्यात नागरिकांना त्रास झाला आहे. हे थांबवण्यासाठी समाजाने खोट्याला खोटे म्हटले पाहिजे. विशेषकरून शासनाने खोट्याची पाठराखण करू नये, अशी अपेक्षा होती. संतोष देशमुख हत्येतील सहआरोपी यांना राजकीय पाठबळामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाचवले आहे. त्यामुळे सहआरोपी करण्याची मागणी करण्याचे बंद करावे लागले आहे.’

वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्याची सुपारी धनंजय मुंडे यांनी दिली होती, असा दावा बीडचा निलंबित फौजदार रणजित कासले याने केला आहे. त्याबाबत जरांगे म्हणाले, ‘तपासात सत्य पुढे येईल. त्याबाबतची सविस्तर माहिती नाही. 20 वर्षे वाल्मीक कराडचा वापर केला, अनेकांच्या हत्या केल्या, पैसे कमावले. आता मारून टाकावे, असे धनंजय मुंडे यांना वाटले असेल. जे काही आहे, ते तपासात निष्पन्न होईल.’

…म्हणून ‘दीनानाथ ‘वर कारवाई नाही !

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सगेसोयरे असल्याने गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांनाही सोडले जाते. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन फसवले. सत्ता हातात आली म्हणून अत्याचार केल्यास जनता सोडणार नाही.’

‘त्या’ अधिकाऱ्यांना घरी बसवणार

‘कुणबी नोंद सापडलेल्या लोकांना अधिकारी जाणीवपूर्वक प्रमाणपत्र देत नाहीत. अशा अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी केली जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या पाठीमागे कोणतीही राजकीय शक्ती असली तरी त्यांना घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही,’ असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला.