
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकार वकील उज्जल निकम यांच्या युक्तिवादावर प्रश्न उपस्थित केला आहे. निकम यांनी टोळीचा म्होरक्या सुदर्शन घुलेला दाखवलंय, वाल्मिक कराडला नाही, ही एकच गोष्ट खटकणारी आहे, असा संशय दमानिया यांनी व्यक्त केला आहे. तसेच धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणीही दमानिया यांनी केली आहे.
गुन्हेगारी कायद्यात कबुलीजबाब फार महत्त्वाचा असतो. आरोपीने कबुलीजबाब दिला असेल तर त्याला दोषी ठरवणं सोपं असतं. पण आरोपीने पोलिसांसमोर कबुली जबाब दिलेला असेल तर तो ग्राह्य धरला जात नाही. मात्र, 164 कलमाखाली न्याय दंडाधिकाऱ्यांसमोरचा जबाब ग्राह्य धरला जातो आणि ताबडतोब खटला चालवणं हे सोपं होतं. त्यामुळे हा जबाब 164 कलमाखाली दिला असेल तर योग्य झालं आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी प्रतिनिधींनी धनंजय मुंडेंना वाचवलं – मनोज जरांगे पाटील
मला आता एकच अडथळा वाटतोय तो म्हणजे काल उज्ज्वल निकम कोर्टात म्हणाले की, टोळीचा म्होरक्या सुदर्शन घुले आहे. पण एक गोष्ट खटकतेय. वाल्मिक कराडच्या मार्गदर्शनाखाली घटना झालीय. पण टोळीचा म्होरक्या सुदर्शन घुले याला दाखवलं आहे, वाल्मिक कराडला दाखवलेलं नाहीये. ही एकच गोष्ट कुठेतरी खटकतेय, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
धनंजय मुंडे यांना सहआरोपी केलं पाहिजे. कारण ही पूर्ण घटना घडली यात अनेकांनी मागून मदत केली होती. त्यात बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, डॉ. वायबसे आणि त्यांची पत्नी, पोलीस निरीक्षक राजेश पाटील आणि प्रशांत महाजन यांचं कोणाचंच नाव आतापर्यंत आरोपपत्रात आलेलं नाहीये. कारण या सगळ्यांना गाईड करणारे, व्हॉट्सअॅप चॅट करणारे हे धनंजय मुंडे होते. म्हणून यांना सहआरोपी केलं जात नाहीये. यांना सहआरोपी केलं गेलं आणि त्यांचे फोन जप्त झाले तर त्याचे धागेदोरे हे थेट धनंजय मुंडेंपर्यंत जाताहेत. यावर कुठेतरी पडदा घालण्याचा प्रयत्न होतोय आणि तो होऊ देणार नाही, असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला.