जसा त्यांचा नेता तसेच त्यांच्या खालचे टपोरी चिल्लर; रक्षा खडसेंच्या मुलीच्या प्रकरणावरून संजय राऊत यांची टीका

जळगावात मिंधे गटाच्या टवाळखोर कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला. या घटनेवरून पुन्हा एकदा राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंध्यांना फटकारले आहे.

”केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग झाला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातून त्यांना वेळच मिळत नाही. पोलीस खातं, राज्यातील कायदा सुव्यवस्था, जनतेचे प्रश्न पाहायला वेळ नाहीए त्यांना”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

”रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग करणारे हे सामाजिक कार्यकर्तेच आहेत ना. वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, धनंजय मुंडे यांच्यासारखे. पक्षाचं मोठं काम यांनी केलेलं आहे. मोठं सामाजिक काम यांनी महाराष्ट्रात उभं केलं आहे. तुम्ही ज्या सामाजिक कार्यकर्त्यांबाबत बोलताय त्याचा फोटो आम्ही दैनिक सामनाच्या पहिल्या पानावर छापलाय. महाराष्ट्रात तुम्ही सत्तेच्या जोरावर काय पेरताय? जिथे सत्ता तिथे बलात्कार खुनी व्याभिचारी जातायत. काल ठाण्यात गेलो तर आमच्या गाड्या अडवायचा प्रयत्न केला. आमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करत होते. आम्ही माननीय दिघे साहेबांनी हार व शाल अर्पण केलं. आमची पाठ वळताच ती शाल व हार या गुंड्यांनी रस्त्यावर फेकले. हा दिघे साहेबांचा अपमान नाही का? दिघे साहेबांच्या गळ्यातील हार पायाखाली तुडवता हे राज्यातील जनतेने पाहिलं. ही तिच प्रवृत्ती आहे जिने केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीचा विनयभंग केला. तोच पक्ष, तिच प्रवृत्ती आणि त्याच महान पक्षाचे हे महान सामाजिक कार्यकर्ते. हे महाराष्ट्र घडवणार आहेत. हे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहेत. जसा त्यांचा नेता तशी त्यांची ही खालची पोरं बाळं, टपोरी चिल्लर. त्यांचा फडणवीसांनी बंदोबस्त केला पाहिजे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

”तुमच्या केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नसेल तर सामान्य कुटुंबातील लेकींची काय परिस्थिती असेल. लाडक्या बहिणी, लाडक्या बहिणी असा खुळखुळा वाजवून फार काळ तुम्हाला इथे राहता येणार नाही. रोज- लाडक्या बहिणीचा विनयभंग होतोय. काय करताय तुम्ही. काय केलं तुम्ही बीडमध्ये. ज्यांचा खून झाला त्या मुंडेंची पत्नी मुलगी पुन्हा आंदोलनाला बसतायत. त्या तुमच्या लाडक्या बहिणी नाही का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता व्हायला अडचण नाही

”विरोधी पक्षनेते पद हा आमचा हक्क आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेसला मोठी परंपरा आहे. सत्ता कुणाचीही असो विरोधी पक्षाने कायम आपली कामगिरी चोख बजावली आहे. तुम्ही निवडून आले आहात. तुमचा विजय संशयास्पद असला तरी विरोधी पक्ष असल्याशिवाय लोकशाहीला दिशा सापडणार नाही. मंत्र्यांची मनमानी सुरू राहिल, भ्रष्टाचारी मोकाट सुटतील, त्यांना वेसन घालण्यासाठी संविधानाने विरोधी पक्ष नेत्याची तरतूद कॅबिनेट दर्जासह केली आहे. शिवसेनेचा विरोधी पक्ष नेते पदाचा व्हायला काही अडचण दिसत नाही, असे संजय राऊत म्हणाले.

कोकणच्या जनतेसोबत शिवसेना

”रिफायनरी प्रकल्प व्हावा म्हणून आमच्यातील माजी आमदारांना त्यांच्याकडे घेतले आहे. या रिफायनरीमुळे लोकांचा जमीन जुमला, रोजगार सगळं नष्ट होतंय त्या भागात समुद्र नष्ट होणार आहे. समुद्राचं विष होणार आहे, प्रदुषण होणार आहे, कोकणची जनता तेथील जमिन जुमला वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत. त्यामुळे आम्ही कोकणच्या जनतेसोबत आहोत ही भूमिका उद्धव ठाकरे यांनी पहिल्या दिवसापासून घेतली आहे, असे संजय राऊत म्हणाले.