फडणवीस खलनायक, कळीचे नारद; संजय राऊत यांचा घणाघात

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे खलनायक आहेत, कळीचा नारद आहेत. त्यांनी महाराष्ट्र कलंकित करण्याचे आणि राज्यात विषाचा प्रवाह निर्माण करण्याचेच काम केले आहे. इतिहासात त्यांची नोंद खलनायक, कळीचा नारद अशीच होईल, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज केला. राज्याचे भले करण्याची संधी फडणवीसांना ईश्वराने दिली होती; पण त्यांनी सत्तेचा, पदाचा आणि यंत्रणेचा गैरवापर लोकशाही संपवण्यासाठी केला असा थेट आरोप करतानाच, महाराष्ट्राच्या जनतेतील तिरस्करणीय व्यक्ती कुणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणावरून फडणवीस यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला. फडणवीस यांनीच समित कदमला अनिल देशमुखांकडे मध्यस्थी म्हणून  पाठवले होते. या समित कदमचे आरएसएस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी जवळचे संबंध आहेत, असे संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी समित कदम आणि भाजप नेत्यांची एकत्रित छायाचित्रेही दाखवली.

आम्ही राजकीय दबावाला बळी पडलो नाही

राजकीय दबावाला जे झुकले नाहीत ते आमच्यासारखे लोक तुरुंगात गेले आणि जे झुकले व घाबरले ते भाजपात गेले, असा आरोपही संजय राऊत यांनी केला. अजित पवार, एकनाथ शिंदे यांची उदाहरणेही त्यांनी दिली. ते म्हणाले की, अजित पवार दिल्लीत वेष पालटून फिरत होते, एकनाथ शिंदे दाढी पांढरी करून फिरत होते, फडणवीसही वेष बदलून फिरायचे. त्यांना तोंडे दाखवायला काय लाज वाटत होती? गद्दारीच करायची होती तर ठामपणे सांगून करायची होती, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा कोणी दिली?

समित कदम या व्यक्तीने असे कोणते काम केले आहे की, त्याला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे? कोणी दिली, राज्याचा गृहमंत्री कोण आहे, असा सवाल करतानाच, देवेंद्र फडणवीस यांनी अशा अजून किती लोकांना सुरक्षा दिली आहे, त्यांच्या जिवाला कोणापासून धोका आहे हे तपासावे लागेल, असे संजय राऊत म्हणाले.