
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात छावा या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रम आणि बलिदानाची गाथा सांगणाऱ्या सिनेमाचे कौतुक केले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना गुरू मानतात त्या गोळवलकर गुरुजींनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात लिखान केले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांना एक आव्हान केले आहे.
”छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत गोळवलकर गुरुजींनी जी भूमिका मांडलीय ती मोदींनी ऐकली पाहिजे. त्यानंतर मोदीजींनी छातीठोकपणे सांगितलं पाहिजे की गोळवलकर गुरुजींनी छत्रपती संभाजी महाराजांवर जे लिहलंय ते चुकीचं आहे व त्यांचा निषेध करायला हवा”, असे आव्हान संजय राऊत यांनी केले आहे.
”प्रधानमंत्र्यांची काय विचारधारा आहे ती सांगू शकत नाही. नुकताच एक चित्रपट बनला आहे. जेव्हा एक ऐतिहासिक फिल्म बनते तेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता त्यातून सत्य समोर आणायचा प्रयत्न करतो. मोदींनी गेल्या दहा वर्षात अनेक चित्रपटांचे त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी मार्केटींग केलेय. कश्मीर फाईल्स, ताश्कंद फाईल्स, अॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर, अशा चित्रपटांना प्रमोट करण्याचे काम भाजपने केलेय. छावा चित्रपटाच्या निर्माणात मोदीजींचे व भाजपचे काहीही योगदान नाही. या चित्रपटाच्या शेवटच्या भागावरून लोकं भावूक झाले आहेत. तेच पाहून मोदीजींनी पंतप्रधान म्हणून नाही तर राजकीय नेते म्हणून यात उडी मारली. मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत गोळवलकर गुरुजींनी जी भूमिका मांडलीय ती मोदींनी ऐकली पाहिजे. त्यानंतर मोदीजींनी छातीठोकपणे सांगितलं पाहिजे की गोळवलकर गुरुजींनी छत्रपती संभाजी महाराजांवर जे लिहलंय ते चुकीचं आहे व त्यांचा निषेध करायला हवा. कारण छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.
नाना पटोलेंनी एकनाथ शिंदे व अजित पवारांना अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, नाना पटोले हे आमचे सहकारी आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. विधानसभेचे अध्यक्षपद भूषविले आहेत. राजकारणात काहीही अशक्य नसतं. 2019 साली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येईल असं कुणाला वाटलं होतं का? त्यानंतर अडीच वर्षांनी अर्धमुर्ध घटनाबाह्य सरकार सत्तेवर येईल असं कुणाला वाटलं होतं का? 2024 साली इतकं मोठं बहुमत फडणवीसांना मिळेल असं कुणी स्वप्नात तरी पाहिलं होतं का? राजकारण आहे. राजकारणात सर्व शक्यता असतात, त्याचा सकारात्मक विचार करून पुढलं पाऊल टाकायचं असतं. नाना पटोलेंनी जर ऑफर दिली असेल तर आम्ही त्याविषयी त्यांच्याशी चर्चा करू, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी वर्षभरानंतर देशातील राजकारण वेगळं असेल असंही सांगितलं.
लाडकी बहिण योजना हा भ्रष्टाचार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहिण योजना हा भ्रष्टाचार असल्याचे म्हटले आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”लाडकी बहिण योजना हा भ्रष्टाचार, लाचखोरी होती हे आम्ही निवडणूकीच्या आधीपासून बोलत आहोत. तेव्हा आम्ही निवडणूक आयोगाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील केली होती. मात्र त्यावर काही कारवाई झाली नाही. राज ठाकरे हे भाजपसोबत असतात. त्यामुळे आता जर राज ठाकरे सच्चे असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करावे व याबाबत त्यांना जाब विचारायला हवा. सर्वच विरोधी पक्षांनी याबाबत एकत्र येऊन सरकारविरोधात आंदोलन करायला हवे.