
भाजपलाही उद्याच्या राजकारणासाठी व्होट जिहादची गरज भासली आहे. बिहारसारख्या राज्यात मुसलमान–यादव मतदार एक झाला तर भाजप आघाडीला आव्हान दिले जाऊ शकते. त्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपने बिहारात ‘सौगात’ वाटपावर भर दिला. ईदच्या निमित्ताने भाजपने 32 लाख गरीब मुस्लिमांना शिधा, कपडे वगैरे वाटले. त्यात चुकीचे काहीच नाही, पण हे सामाजिक कार्य अन्य एखाद्या राजकीय पक्षाने केले असते तर ‘व्होट जिहाद’ म्हणून बांग मारत ‘हिंदू खतरे में’चे तांडव भाजपातील बाटग्यांनी सुरूच केले असते. आता त्या सर्व बाटग्यांना हिरव्या लुंग्या गुंडाळून मोदींनी मशिदीत ‘सौगात’ वाटायला पाठवले आहे. मोदीजी, तुम्हारा जवाब नहीं. अंधभक्तांना असे तोंडावर पाडू नका साहेब!
पंतप्रधान मोदी यांचे मुसलमान प्रेम अचानक उफाळून आले व त्यांनी ‘ईद’निमित्त 32 लाख मुस्लिमांसाठी ‘सौगात-ए-मोदी’ची घोषणा केली. ईदसाठी ही विशेष सौगात आहे. त्या सौगात किटमध्ये काय आहे? त्यात एक साडी, एक लुंगी, शेवया, साखर वगैरे आहे. रमझानच्या ‘पाक’ महिन्यात भाजपने 32 लाख मुसलमानांच्या घरी जाऊन या सौगातचे वाटप केले. त्यासाठी भाजपने 32 हजार कार्यकर्त्यांवर हे सौगात वाटपाचे काम सोपवले होते. हे भाजपचे कार्यकर्ते मुस्लिमांच्या वस्त्यांत, मशिदीत जाऊन मोदींच्या सौगातचे वाटप करतानाचे चित्र बाटग्या हिंदुत्ववाद्यांना विचलित करणारे होते. ‘सौगात-ए-मोदी’ हे एक राजकीय ढोंग आहे व निवडणुकांसाठी सुरू झालेले मुस्लिमांचे लांगूलचालन आहे. रमझाननिमित्त अनेक ठिकाणी ‘दावत-ए-इफ्तार’ सुरू आहेत व बिहारात या इफ्तार पार्ट्यांना भाजपच्या पुढाऱ्यांनी हजेरी लावली. दिल्लीतही भाजपचे अनेक नेते व मंत्री इफ्तार पार्ट्या झोडत आहेत. आपण निधर्मी असल्याचा देखावा हे लोक निर्माण करीत आहेत. मोदी व त्यांचे लोक देशात टोकाचा धार्मिक द्वेष निर्माण करीत आहेत. मुसलमानांवर हल्ला करण्याची, त्यांना देशद्रोही ठरविण्याची एकही संधी हे लोक सोडत नाहीत. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी तर ‘उर्दू’ भाषेवर बंदी घालायचे फर्मान सोडले, पण मोदी यांनी आता योगींच्या उर्दू विरोधाचीच लुंगी सोडली. ईदनिमित्त मोदी यांनी जे ‘सौगात-ए-मोदी’ सुरू केले तो ‘सौगात’ हा शब्द व संकल्पनाच मुळात उर्दू आहे. त्यामुळे भाजपचे दुटप्पी वागणे वारंवार समोर येत आहे. खरे तर भाजपला सध्या मुसलमान डोळ्यांसमोर नको आहेत, पण भाजपचा मुसलमानांसाठी स्वतंत्र अल्पसंख्यांक विभाग आहे व त्या माध्यमातून
‘सौगात-ए-मोदी’चे वाटप
सुरू आहे. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते दिल्लीच्या निजामुद्दीन येथून ‘सौगात’ वाटपाची सुरुवात झाली. हेच ते मोदी व नड्डा ज्यांनी लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर झालेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत ‘वोट जिहाद’ची बांग देऊन हिंदू-मुसलमानांत दुफळी निर्माण केली होती व मुसलमानांपासून सावध रहा असे सांगितले होते. ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’सारखे धार्मिक ध्रुवीकरणाचे नारे प्रचारात आणले. मुसलमानांनी मतदानास उतरूच नये यासाठी जोरजबरदस्तीचे प्रयोग केले. पंतप्रधान मोदी यांची भाषा अत्यंत खालच्या पातळीवरची होती. मुसलमान हे घुसखोर आणि देशद्रोही आहेत. भाजपला मतदान केले नाही तर ते तुमचे घर, जमीन हिसकावून घेतील, तुमचे मंगळसूत्र खेचून पळतील. तुमच्याकडे दोन गाई असतील तर त्यातील एक गाय ते ओढून नेतील. मुसलमान तुम्हाला कंगाल करतील, अशी घृणास्पद भाषा करून मुसलमानांच्या विरोधात डोकी भडकवण्याचे काम मोदी यांनी केले. त्याच मोदींवर ईदनिमित्त ‘सौगात’ वाटप करण्याची वेळ का आली? की हे एक ढोंगच म्हणायचे? मोदी व त्यांच्या पक्षाची विचारधारा ही गरीब मुसलमानांच्या बाबतीत विषारी आहे. मोदी हे श्रीमंत मुसलमानांसाठी पायघड्या घालतात. कतारच्या राजाच्या स्वागताला मोदी स्वतः विमानतळावर जातात व मिठ्या मारतात. दुबईत जाऊन तेथील शेख साहेबांची चमचेगिरी करतात व इथे भारतात गरीब मुसलमानांच्या घरांवर द्वेषाने बुलडोझर चालवतात. मुसलमानांचे जगण्याचे सर्व व्यवसाय बंद पडावेत यासाठी मोदींचे लोक सतत उपद्व्याप करतात. महाराष्ट्रात तर मोदींच्या ‘नेपाळी’
टिल्ल्या अंधभक्ताने
मुसलमानांकडून हिंदूंनी मटण खरेदी करू नये असे फर्मान सोडले व त्यावर महाराष्ट्रातील भाजप सरकारने ‘ब्र’ काढला नाही. तेच भाजपवाले गेल्या चार दिवसांपासून मुस्लिम मोहोल्ल्यांत जाऊन ‘मोदींची सौगात’ वाटताना, खजूर, शेवया, लाडू, लुंग्या, साड्या वाटून मुसलमानांची खुषामत करताना दिसले. ‘सौगात-ए-मोदी’ किटमधील लुंग्या या कडक हिरव्या रंगाच्याच असाव्यात यावर मुंबईतील भाजपवाल्यांचा कटाक्ष होता व त्या हिरव्या लुंग्या आपल्या कमरेस लावून काहींनी त्याचे प्रात्यक्षिकही केले. मुसलमानांचे लांगूलचालन करावे असे मोदी व त्यांच्या लोकांना आता वाटत आहे. तो ‘डाव’ लोकशाहीच्या विरोधात आहे. मुसलमानांची मतेही आम्हालाच मिळतात हे भविष्य काळात दाखवले जाईल. मुसलमान बहुसंख्य असलेल्या मोहोल्ल्यांत व त्या त्या बुथवर बनावट मतदार याद्या, बनावट मतदार व ईव्हीएमद्वारे ‘चोऱ्या’ करून मते भाजपच्या पारड्य़ात घातली जातील व मुसलमानांनी मोदींना ‘सौगात’ दिल्याची बांग भाजपवाले मारतील असा एकंदरीत डाव दिसतो. म्हणजे भाजपलाही उद्याच्या राजकारणासाठी व्होट जिहादची गरज भासली आहे. बिहारसारख्या राज्यात मुसलमान-यादव मतदार एक झाला तर भाजप आघाडीला आव्हान दिले जाऊ शकते. त्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपने बिहारात ‘सौगात’ वाटपावर भर दिला. ईदच्या निमित्ताने भाजपने 32 लाख गरीब मुस्लिमांना शिधा, कपडे वगैरे वाटले. त्यात चुकीचे काहीच नाही, पण हे सामाजिक कार्य अन्य एखाद्या राजकीय पक्षाने केले असते तर ‘व्होट जिहाद’ म्हणून बांग मारत ‘हिंदू खतरे में’चे तांडव भाजपातील बाटग्यांनी सुरूच केले असते. आता त्या सर्व बाटग्यांना हिरव्या लुंग्या गुंडाळून मोदींनी मशिदीत ‘सौगात’ वाटायला पाठवले आहे. मोदीजी, तुम्हारा जवाब नहीं. अंधभक्तांना असे तोंडावर पाडू नका साहेब!