सामना अग्रलेख – मोदींचा मार्शल लॉ!

मोदी हे भाषणात खोटेपणाचे पतंग उडवतात. त्यांच्या उडवाउडवीचा जनतेला वीट आला आहे. मोदी यांच्या पायाखालची बहुमताची सतरंजी मतदारांनी ओढून घेतली तरी मोदी सुधारायला तयार नाहीत. मोदी यांना पन्नास वर्षांपूर्वीच्या आणीबाणीने अकारण त्रस्त केले आहे. खरे तर मोदी यांना त्रस्त व्हायचे कारण नाही. कारण आणीबाणीपेक्षा भयंकर स्थिती त्यांच्या राज्यात सुरू आहे. श्रीमती गांधी यांनी घोषित आणीबाणीच लावली. मोदी यांच्या राज्यात तर एक प्रकारे ‘मार्शल लॉ’सारखीच स्थिती निर्माण झाली आहे. मोदी यांना सुधारण्याची, स्वतःला दुरुस्त करण्याची संधी होती, पण ते अवघडच दिसत आहे.

नरेंद्र मोदी यांच्यात बदल होईल काय? (म्हणजे ते आता तरी सुधारतील काय?) असा प्रश्न अनेकांना अनेकदा पडत असेल. पंतप्रधानपदावर तीन वेळा बसलेल्या व्यक्तीने निदान देशाला भ्रमित करण्याची, खोटे बोलण्याची सवय तरी सोडून दिली पाहिजे, पण तिसऱ्यांदा शपथ घेऊनही मोदी बदलायला तयार नाहीत. त्यांचे फेकणे सुरूच आहे. राज्यसभेतील त्यांचे बुधवारचे भाषण हा फेकाफेकीचा उत्तम नमुना आहे. मोदी यांना आता विकासावर बोलावेसे वाटले. मागच्या दहा वर्षांत विकास वगैरे काही झालेला नाही. देशातील 80 कोटी लोकांना महिन्याला माणशी पाचेक किलो धान्य फुकटात देणे याला मोदी विकास मानत असतील तर ते देशाला फसवत आहेत. राज्यसभेतील एक सदस्य मनोज झा यांनी सांगितले, ‘‘ग्रामीण भागात आता मजूर मिळत नाहीत. लोकांना घरबसल्या फुकट धान्य मिळते. त्यामुळे लोक आळशी होत आहेत. मजूर मिळत नसल्याने कामे रखडली आहेत.’’ मोदी व त्यांच्या सरकारने गरिबी निर्मूलनाच्या नावाखाली कोटय़वधी लोकांना घरबसे व आळशी केले. घरी बसा व फुकटात धान्य घ्या, त्या बदल्यात आम्हाला मते द्या, अशी मोदी यांची भूमिका दिसते. मोदी यांनी त्यांच्या भाषणात जे पतंग उडवले तेदेखील नेहमीचेच होते. तीच दारू, तीच बाटली, बाकी काय? मोदी यांनी भ्रष्टाचार निपटून काढण्याचा जुनाच नारा दिला. भ्रष्टाचाऱ्यांना, गुन्हेगारांना सोडणार नाही. ईडी, सीबीआयच्या नावाने उगाच बोंब मारू नका. या संस्था उत्तम काम करीत असल्याचे मोदी सांगतात तेव्हा आश्चर्य वाटते. केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या घरगडय़ाप्रमाणे वागत आहेत. या संस्था

तटस्थपणे

काम करीत असत्या तर त्यांना दोष देण्याचे कारण नव्हते, पण मागच्या दहा वर्षांत ईडी, सीबीआयने फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच धाडी घातल्या, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, त्यांना अटका केल्या. यापैकी काही प्रमुख ‘आरोपी’ भाजपात गेले तेव्हा त्यांना अभय मिळाले व कारवाया थांबल्या, हे खरे नाही काय? अजित पवार, अशोक चव्हाण यांच्या हजारो कोटींच्या भ्रष्टाचारावर हल्ला करणारे हेच मोदी होते. हे दोन्ही नेते आज मोदी यांच्या मांडीवर बसले आहेत. असे असंख्य भ्रष्टाचारी मोदी यांच्या तंबूत आज आनंदात नांदत आहेत. तरीही मोदी भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही असे सांगतात. इतक्या धीटपणे खोटे फक्त मोदीच बोलू शकतात. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्था पक्षपाती आहेत. अनिल देशमुख, संजय राऊत, हेमंत सोरेन यांच्या विरोधात मनी लाँडरिंगचे कोणतेही पुरावे नसल्याचे न्यायालयानेच सांगितले. केजरीवाल यांना नाहक अडकवले, असे ईडीचे कोर्ट सांगते. मग या संस्था सरळमार्गी आहेत व त्यांच्यावर राजकीय दबाव नाही असे कसे मानायचे? पण मोदी धाडसाने खोटे बोलतात. निवडणूक प्रचार सभेत मोदी यांनी सांगितले की, अंबानी व अदानी हे काँग्रेसला टेम्पो भरून पैसे देतात. पंतप्रधानांनी हे सांगितले म्हणजे खरेच असणार. मग ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सने अदानी, अंबानी यांना चौकशीसाठी बोलावले काय? निदान मोदी यांना तरी बोलवा. निवडणूक रोखे प्रकरणात भाजपने अनेक कंपन्यांना ‘ठेके’ देऊन, धमक्या देऊन हजारो कोटी आपल्या खात्यात जमा केले. भाजपला पैसे देणाऱया अनेक कंपन्यांवर ‘ईडी’ची कारवाई सुरू आहे. म्हणजे हा

गुन्हेगारीचा पैसा

‘मनी लाँडरिंग’ पद्धतीने भाजपने जमा केला व मोदी शहाजोगपणे भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या वल्गना करतात. यास ढोंगच म्हणायला हवे. मोदी यांनी गायी कापणाऱ्या व गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांकडून निधी स्वीकारला व लोकसभेत ते हिंदुत्वावर प्रवचने झोडतात. मोदी यांच्या हिंदुत्वाचा पराभव प्रत्यक्ष अयोध्येतच झाला. कारण सत्यवचनी रामाला भाजपचा खोटारडेपणा मान्य नव्हता. मोदी हे भाषणात खोटेपणाचे पतंग उडवतात. त्यांच्या उडवाउडवीचा जनतेला वीट आला आहे. मोदी यांच्या पायाखालची बहुमताची सतरंजी मतदारांनी ओढून घेतली तरी मोदी सुधारायला तयार नाहीत. मोदी यांना पन्नास वर्षांपूर्वीच्या आणीबाणीने अकारण त्रस्त केले आहे. खरे तर मोदी यांना त्रस्त व्हायचे कारण नाही. कारण आणीबाणीपेक्षा भयंकर स्थिती त्यांच्या राज्यात सुरू आहे. 1975 साली विरोधी नेत्यांनी सैनिकांना सरकारविरुद्ध बंड करण्याची चिथावणी दिली हे मोदींना मान्य आहे काय? मोदींना त्यांच्याविरुद्ध काढलेले व्यंगचित्र सहन होत नाही. व्यंगचित्रकारांवर ते देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतात. इथे तर देशाच्या सैन्यालाच देशविरोधी पृतीचे आवाहन केले गेले होते. पोलिसांनी सरकारी आदेश पाळू नयेत असे चरणसिंग वगैरे नेते तेव्हा सांगत होते व ते भयंकर होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी बॉम्ब बनविण्याचा कारखानाच उघडला होता व त्यांना इंदिरा गांधी यांनाच उडवायचे होते. हे सर्व घडवले जात असताना इंदिरा गांधी यांनी काय करायला हवे होते, असा मोदींचा सल्ला आहे? श्रीमती गांधी यांनी घोषित आणीबाणीच लावली. मोदी यांच्या राज्यात तर एक प्रकारे ‘मार्शल लॉ’सारखीच स्थिती निर्माण झाली आहे. मोदी यांना सुधारण्याची, स्वतःला दुरुस्त करण्याची संधी होती, पण ते अवघडच दिसत आहे.