सामना अग्रलेख – लाडक्या बहिणीची हत्या

वरळीच्याहिट अ‍ॅण्ड रनघटनेने मुंबईच्या रस्त्यावर माणुसकी चिरडून मेली. मुंबईतील धनाढय़ांना जणू संवेदनाच उरलेली नाही. या घटनेतील मृत कावेरी नाखवा या प्रख्यात मराठी कलावंत जयवंत वाडकर यांच्या जवळच्या नातेवाईक आहेत. आरोपीस वाचवण्यासाठी प्रकरण मॅनेज होतेय असा आरोप वाडकर यांनीही केला आहे. मात्र अशा प्रसंगी मुंबईतील मराठी नटनटय़ा मंडळही गप्पच बसून राहते. मिंधे सरकारला जाब विचारण्याची हिंमत कुणात दिसत नाही, कारण सगळेच मिंधे झाले आहेत. कुणाला बक्षिसे, कुणाला बिदाग्या दिल्या गेल्या असल्याने त्यांच्या ओझ्याखाली कावेरी नाखवा या लाडक्या बहिणीच्या किंकाळय़ा विरून गेल्या. आरोपी मिहीर शहाचा गुन्हा हा सदोष मनुष्यवधाचा आहे. पोलिसांनी त्याच्या फाशीची मागणी न्यायालयात करायला हवी. तरच लाडक्या बहिणीला न्याय मिळेल!

महाराष्ट्राचे ‘मिंधे सरकार’ म्हणजे गुन्हेगारांनी गुन्हेगारांना वाचविण्यासाठी चालविलेले सरकार आहे, याविषयी आता कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. गुन्हेगार निर्ढावले आहेत व त्यांना कायद्याची भीती अजिबात राहिलेली नाही. पोलीस आयुक्त, फौजदार फक्त गणवेश घालण्यापुरतेच उरलेले आहेत आणि राज्याच्या गृहमंत्र्यांची अवस्था एखाद्या बुजगावण्यासारखी झाली आहे. वरळी ‘हिट अ‍ॅण्ड रन’ गुन्हय़ातील आरोपी मिहीर शहाला मुंबई पोलिसांनी तीन दिवसांनी अटक केली. मिहीर शहाने एका निरपराध महिलेची भररस्त्यावर हत्या केली आहे. नशेच्या अंमलाखाली त्याने आलिशान गाडी भरधाव चालवून कावेरी नाखवा यांचा निर्घृण पद्धतीने बळी घेतला. कावेरी नाखवांना शंभर मीटरपर्यंत फरफटत नेले. नाखवा यांचे पतीही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आरोपी मिहीर शहा पळून गेला. मिहीरच्या बापाचे राजकीय वजन आहे व तो थेट मुख्यमंत्र्यांच्या आतल्या गोटातला हस्तक असल्याने पोलिसांवर प्रचंड दबाव हा असायलाच हवा. पोलिसांनी मिहीरला त्वरित पकडले असते तर वैद्यकीय चाचणीत त्याने नशा केल्याचे सिद्ध झाले असते. पण तीन दिवसांनी आरोपी पोलिसांच्या हाती लागला. त्यामुळे त्याची नशेखोरी पोलीस सिद्ध करू शकतील काय? अर्थात जुहूतील एका पबमध्ये या मिहीरने दारू ढोसली व तो ड्रायव्हिंग सीटवर बसल्याचे सीसी टीव्ही फुटेज समोर आले आहे. मिहीर शहा याने एका निरपराध महिलेस चिरडून मारले. हा अनवधानाने घडलेला अपघात नसून आरोपीने दारू पिऊन केलेला सदोष मनुष्यवध आहे. बिघडलेल्या बापजाद्यांची ही बिघडलेली कार्टी रस्त्यावरील सामान्य माणसांना किडय़ामुंग्यांसारखी चिरडून पुढे जातात व आपल्या गाडीखाली कोणी तरी जिवाच्या आकांताने तडफडतो आहे याचे भानही त्यांना नसते.

पोलीस कायदा विकत घेऊन

अशा प्रकरणातले आरोपी जामिनावर सुटतात व पुढे या खटल्यांचे काय होते ते कधीच कुणाला कळत नाही. पुण्यातील ‘पोर्शे’ कार प्रकरणात असाच एक आरोपी वेदांत अग्रवाल याने नशेच्या अंमलात तरुण-तरुणीचा जीव घेतला. तेव्हा त्यालाही वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न राजकीय मंडळींनी केले. आरोपी दारू पिऊन गाडी चालवत होता हे लपविण्यासाठी त्याच्या रक्ताचे सॅम्पलच बदलण्यात आले व आरोपीच्या जागी त्याच्या आईचे रक्त घेऊन खुनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला. पोलीस व न्यायालयाने संगनमत करून आरोपीला जामीन मिळवून दिला, पण या प्रकरणी पुणेकर जनतेचा उठाव इतका भयंकर होता की, पोलिसांना नव्याने तपास करून आरोपीस पुन्हा ताब्यात घ्यावे लागले. या प्रकरणातही आरोपीची आई, बाप, आजोबा अशांना शेवटी अटक झाली. वरळी प्रकरणातही आरोपीच्या संपूर्ण कुटुंबास अटक झाली. पण ही कारवाई म्हणजे वरवरचा देखावा तर नाही ना? भररस्त्यावर एका महिलेचा केलेला खून पचवून ढेकर द्यायची क्षमता आरोपी मिहीर शहा व त्यांच्या कुटुंबात आहे. आरोपीच्या पिताश्रींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे व त्यामुळेच तो मुख्यमंत्र्यांच्या आतल्या गोटात वावरतो. मुख्यमंत्री व त्यांच्या कार्यालयातून पोलीस स्टेशनला सरळ फोन जातात व समर्थक गुन्हेगारांना वाचवा अशा सूचना केल्या जातात. आता म्हणे या राजेश शहा नावाच्या ‘महात्म्या’ला मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षातून काढून टाकले आहे. गुन्हा एवढा ढळढळीत असताना या महाशयांना पक्षातून काढण्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी 60 तास घेतले. महाराष्ट्राचे सरकार हे केवळ श्रीमंत व गुन्हेगारांसाठीच काम करत आहे. तसे नसते तर कावेरी नाखवा यांचा खून करणाऱ्या मिहीर शहाच्या बापाला जामीन मिळालाच नसता. या राजेश शहाने आपल्या

खुनी पोराला पळून जाण्यासाठी

मदत केली व पुरावेही नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तरीही खुन्याचा बाप जामिनावर सुटतो हा चमत्कार मिंधे सरकारमध्येच घडू शकतो. मृत कावेरी नाखवा यांची मुलगी व पतीचा आक्रोश बधिर सरकारपर्यंत पोहोचेल काय? कावेरी नाखवा यांचे पती सांगतात, ‘‘अपघात झाला तेव्हा मी आरोपीला गाडी थांबविण्याची विनवणी करीत होतो. मी त्याच्या गाडीच्या बोनेटवर जोरात हात आपटला तरीही त्याने गाडी थांबवली नाही व तो माझ्या पत्नीला तसाच फरफटत पुढे घेऊन गेला. गरीबांना या जगात कोणी वाली नाही.’’ कावेरीचे पती प्रदीप नाखवा यांचा हा आकांत आहे. मुख्यमंत्री राजकीय फायद्यासाठी ‘लाडकी बहीण’ योजनेचे ढोल वाजवीत फिरत आहेत. पण त्यांच्याच आतल्या गोटातील गुन्हेगाराने कावेरी नाखवा या लाडक्या बहिणीची हत्या केली. तिला चिरडून मारले व आता बहिणीच्या खुन्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. वरळीच्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’ घटनेने मुंबईच्या रस्त्यावर माणुसकी चिरडून मेली. मुंबईतील धनाढय़ांना जणू संवेदनाच उरलेली नाही. या घटनेतील मृत कावेरी नाखवा या प्रख्यात मराठी कलावंत जयवंत वाडकर यांच्या जवळच्या नातेवाईक आहेत. आरोपीस वाचवण्यासाठी प्रकरण मॅनेज होतेय असा आरोप वाडकर यांनीही केला आहे. मात्र अशा प्रसंगी मुंबईतील मराठी नटनटय़ा मंडळही गप्पच बसून राहते. मिंधे सरकारला जाब विचारण्याची हिंमत कुणात दिसत नाही, कारण सगळेच मिंधे झाले आहेत. कुणाला बक्षिसे, कुणाला बिदाग्या दिल्या गेल्या असल्याने त्यांच्या ओझ्याखाली कावेरी नाखवा या लाडक्या बहिणीच्या किंकाळय़ा विरून गेल्या. आरोपी मिहीर शहाचा गुन्हा हा सदोष मनुष्यवधाचा आहे. पोलिसांनी त्याच्या फाशीची मागणी न्यायालयात करायला हवी. तरच लाडक्या बहिणीला न्याय मिळेल!