सामना अग्रलेख – अहो, सिंघम!

महाराष्ट्राचे स्वयंघोषित सिंघम ‘धर्मवीर-3’ लिहिणार आहेत. राज्यकर्ते त्यांची कामे सोडून ही स्टंटबाजी करत आहेत व राज्यात गुन्हेगार व बलात्कारी मोकाट सुटले आहेत. मंत्रालयाची व सरकारी बंगल्यांची या लोकांनी ‘फिल्मसिटी’ म्हणजे चित्रनगरीच करून ठेवली. कथा-पटकथा लिहाव्यात असे अनेक ‘खलनायक’ भाजपात आहेत. फडणवीस यांनी त्या विषयांना हात घातला पाहिजे. गृहमंत्री फडणवीस हे सिंघम, अभिमन्यू, यांच्याबरोबर कथा-पटकथाकार सलीम-जावेदही होऊ इच्छित आहेत. एक ना धड भाराभर चिंध्या अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यात महाराष्ट्राच्या इभ्रतीच्या चिंध्या चिंध्या झाल्या आहेत. राज्याच्या या नव्या सिंघम साहेबांनी नालासोपारा व कोरेगावच्या बलात्काऱ्यांनाही ‘बदला’पूरचाच न्याय द्यावा. नाहीतर तुमचा सिंघम फक्त पोस्टरवरच राहील!

महाराष्ट्राचे गृहमंत्री फडणवीस यांनी स्वतःला ‘सिंघम’ म्हणून घोषित केले आहे. सिंघम हा चित्रपटाच्या पडद्यावर गुन्हेगारांचा वगैरे कर्दनकाळ असतो. दे मार पद्धतीने सिंघम मारामाऱ्या करतो. हवेत वगैरे उंच उड्या मारतो. या इमारतीवरून त्या इमारतीवर उड्या मारून गुन्हेगारांना पकडून आपटण्याचे कौशल्य त्याच्या अंगात आहे. महाराष्ट्रातील ‘स्वयंघोषित’ सिंघमने बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला मारले व महाराष्ट्रभर या सिंघमचे पोस्टर झळकले. आता या सिंघमने जाहीर केले आहे की, ‘सिंघमच्या भूमिकेतून आपण अभिमन्यूच्या भूमिकेत शिरलो आहोत व महाराष्ट्राचा अभिमन्यू मीच. मी चक्रव्यूह तोडून बाहेर येईन.’ सगळी गंमतच आहे. दोन दिवसांनी हे स्वयंघोषित सिंघम म्हणजे फडणवीस स्वतःला हनुमान, भीम, जटायू अशा अवतारात पाहतील. अयोध्येचा राजा मीच होतो असेही सांगतील. फडणवीस असे का बोलत आहेत? कारण त्यांच्याच लोकांनी त्यांचा अभिमन्यू करून त्यांना चक्रव्यूहात अडकवले आहे. ज्या माणसाला महाराष्ट्राची कायदा, सुव्यवस्था धड सांभाळता येत नाही तो स्वतःला अभिमन्यू वगैरे असल्याचे घोषित करतो हे आक्रितच म्हणावे लागेल. काहीच धड करता येत नसल्याने ‘सिंघम’ ऊर्फ फडणवीस हे सध्या विविध भूमिका वठविणारे एक नट म्हणून वावरत आहेत. या सिंघमने बदलापूरच्या अक्षय शिंदेला मारले, पण या शिंदेचे खरे पाठीराखे आपटे, कोतवाल वगैरे लोकांपर्यंत हा सिंघम अद्यापि पोहोचू शकला नाही. शिंदेला मारल्यावर सिंघमच्या खाकी वेशात फडणवीस सर्वत्र झळकले, पण फडणवीसांपेक्षा मीच खरा सिंघम असल्याचे मुख्यमंत्री मिंधे यांनी जाहीर केले. म्हणजे आता महाराष्ट्राला दोन जुळे सिंघम प्राप्त झाले आहेत. एका

एन्काऊंटरमुळे

राज्यकर्ते सिंघम पदास प्राप्त झाले तरी या दोन सिंघमच्या काळात बलात्कार व महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. पुन्हा हे सर्व बलात्कारी ‘सिंघम’ पक्षाशी संबंधित आहेत. नालासोपाऱ्यात भाजपचा एक पदाधिकारी श्रीवास्तव याने एका तरुणीस गुंगीचे औषध पाजून बलात्कार केल्याचे प्रकरण गंभीर आहे. या बलात्काऱ्याचे फोटो भाजपच्या पॉर्नस्टारबरोबर व नव्या सिंघमबरोबर झळकले. हा बलात्कारी भाजपचा लाडका असल्याने भाजपच्या सर्व महिला सिंघम गप्प आहेत. अक्षय शिंदेप्रमाणे नालासोपाऱ्याच्या या बलात्काऱ्यास गोळ्या घालाव्यात असे नव्या सिंघमला वाटत नाही. पुण्याच्या कोरेगावात एका कॉलेज तरुणीवर दोघांनी बलात्कार केला व त्या तरुणीचे नग्न फोटो समाजमाध्यमांवर टाकले. हे सर्व अंमली पदार्थाच्या नशेत घडले. त्या तरुणांचा गुन्हा बदलापूरच्या गुन्ह्याइतकाच भयंकर आहे. पण या दोन्ही गुन्हेगारांचे बाप फडणवीस यांच्या भाजपशी संबंधित बडी धेंडे आहेत. त्यामुळे फडणवीसांमधला सिंघम जागा झाला नाही. नालासोपारा व कोरेगाव पुण्याच्या बलात्काऱ्यांना अभय व अक्षय शिंदेचेच एन्काऊंटर, हा कसला न्याय? कोरेगावचे बलात्कार प्रकरण अल्पवयीन मुलीचे आहे. तिचा फोटो प्रसिद्ध करून तिच्या आयुष्याचे साफ धिंडवडेच काढले. त्यामुळे राज्याच्या दोन्ही सिंघमसाहेबांनी हातात बंदुका घेऊन या गुन्हेगारांना खतम करायला हवे. तरच ‘बदला’पूरा झाला असे म्हणता येईल. पुण्याचा पोलीस आयुक्त हा एक नंबरचा बकवास व ‘संघी’ विचारांचा लोचट माणूस आहे. हे महाशय आयुक्त कमी व भाजपचे हस्तक म्हणून जास्त कार्य करीत आहेत. पोर्शे कारचे

प्रकरण दडपण्याचा

प्रयत्न त्यांनी केला. यांच्या काळात पुण्यात अंमली पदार्थ, खून, भररस्त्यावर गँगवॉर, बलात्कारासारख्या गुह्यांत वाढ झाली आहे. पण सरकारचे अभय असल्याने पुण्यातील पोलीस आयुक्तांचा बाल बाका झाला नाही. सिंघम कम अभिमन्यू साहेबांनी राज्याच्या महिला वर्गालाच चक्रव्यूहात अडकवले आहे व बाहेरून भाजपचे दुर्योधन अबलांच्या पिंकाळ्यांची मजा घेत आहेत. देशाचे गृहमंत्री नाशकात असताना नाशकात बलात्कार होतात. पंतप्रधान पुण्यात येत असताना पुण्यात बलात्कार होतात. फडणवीस जेथे जातील तेथे बलात्कार व महिला अत्याचाराचे सत्र सुरूच आहे व हे सर्व रोखण्याचे सोडून गृहमंत्री फडणवीस हे आता ‘धर्मवीर-3’ चित्रपटाचे कथानक लिहायला बसणार आहेत. महर्षी व्यासांनी महाभारत लिहिले, वाल्मीकींनी रामायण लिहिले. आता महाराष्ट्राचे स्वयंघोषित सिंघम ‘धर्मवीर-3’ लिहिणार आहेत. राज्यकर्ते त्यांची कामे सोडून ही स्टंटबाजी करत आहेत व राज्यात गुन्हेगार व बलात्कारी मोकाट सुटले आहेत. मंत्रालयाची व सरकारी बंगल्यांची या लोकांनी ‘फिल्मसिटी’ म्हणजे चित्रनगरीच करून ठेवली. कथा-पटकथा लिहाव्यात असे अनेक ‘खलनायक’ भाजपात आहेत. फडणवीस यांनी त्या विषयांना हात घातला पाहिजे. गृहमंत्री फडणवीस हे सिंघम, अभिमन्यू, यांच्याबरोबर कथा-पटकथाकार सलीम-जावेदही होऊ इच्छित आहेत. एक ना धड भाराभर चिंध्या अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यात महाराष्ट्राच्या इभ्रतीच्या चिंध्या चिंध्या झाल्या आहेत. राज्याच्या या नव्या सिंघम साहेबांनी नालासोपारा व कोरेगावच्या बलात्काऱ्यांनाही ‘बदला’पूरचाच न्याय द्यावा. नाहीतर तुमचा सिंघम फक्त पोस्टरवरच राहील!