
पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म आणि नाव विचारून त्यातील हिंदूंना टिपून मारले. या हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाले, तर 20 जण जखमी झाले. 2019 मधील पुलवामा हल्ल्यानंतरचा हा मोदींच्या राजवटीतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असून सुरक्षा व्यवस्थेच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या आहेत. देशावरील या गंभीर संकटातही सत्ताधारी संधीसाधू राजकारण करत असल्याचा आरोप सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे.
या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म आणि नाव विचारून गोळ्या घातल्याचे वृत्त देण्यात येत आहे. या दहशतवादी हल्ल्यात सय्यद हुसैन शाह या जम्मू कश्मीरमधील अनंतनाग येथील व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या असे वृत्त देण्यात येत आहे, तर मग दहशतवाद्यांनी या सय्यद हुसैन या मुस्लिम नागरिकाला गोळ्या का घातल्या? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. धर्माच्या नावावर राजकारण करणे बंद करा, असेही काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. देशावरील दहशतवादी हल्ला हे गंभीर संकट आहे. या संकटाच्या काळात सत्ताधाऱ्यांनी धर्माच्या नावाने राजकारण करू नये, हल्लातील दोषींना शोधून कठोर करावाई करावी, अशा भावनाही सोशल मिडीयावर व्यक्त होत आहे.
दहशतवादी पर्यंटकांवर गोळीबर करत असताना सय्यद शाह पर्यटकांच्या रक्षणासाठी पुढे आले. त्यामुळे संतप्त झालेल्या दहशतवाद्यांनी त्यांनाही गोळ्या घातल्या, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना धर्म, जात, पात माणुसकी नसते. हेच यावरून दिसून येत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी या गंभीर संकटात नेहमीचे धर्माचे राजकारण करू नये. दोषींना शोधून कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.