Rohit Sharma : बरं झालं सूर्याच्या हातात बॉल बसला, नाहीतर…; रोहितने बोलताच सगळे खळखळून हसले

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी20 विश्वचषकात जगज्जेता ठरलेल्या हिंदुस्थानी संघाचा विजयोत्सव मोठ्या थाटात मुंबईत पार पडला. या विजयविरांमध्ये असलेल्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात आज (05 जुलै) सत्कार सोहळा पार पडला. यावेळी रोहित शर्माने भाषण करतेवेळी “बरं झालं सूर्याच्या हातात बॉल बसला, नाहीतर पुढे त्याला मी बसवला असता.” अस म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

हिंदुस्थानी संघामध्ये कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल हे चार मुंबईकर खेळाडूंचा सत्कार विधीमंडळाच्या आवारात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सर्व खेळाडूंनी आपले मनोगत व्यक्त केले. या सर्वांमध्ये रोहित शर्माने आपल्या भाषणातून चौकार षटकार ठोकत सर्वांची मनं जिंकली. “सर्वांना माझा नमस्कार, काल जे आम्ही मुंबईमध्ये बघीतलं ते सर्वांचे एक स्वप्न होते. अकरा वर्ष आम्ही या वर्ल्ड कपसाठी थांबलो होते. 2013 मध्ये आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो होते. सर्व खेळाडूंचा मी मनापासून आभारी आहे, कारण हे सर्व खेळडूंमुळे शक्य झाले आहे. सर्व खेळाडू चांगल्या दर्जाचे आहेत. संगळ्यांनी संघाला गरज असताना मोलाचे योगदान दिले.” अस म्हणत रोहित शर्माने सर्व खेळाडूंचे आभार मानले.

“सूर्याने आता सांगितलं की, त्याच्या हातात बॉल बसला, तर बरं झालं बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवला असता.” अस रोहित शर्मा चेष्टेत म्हणाला आणि सभागृहात एकच हशा पिकला.