कॉन्ट्रॅक्टरला मलिदा देण्यासाठी गरीबांना दिलेला शब्द फिरवला! रोहित पवारांची सरकारवर टीका

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी विधानभवनात राज्याचा अर्थसंकसल्प (Maharashtra budget 2025) सादर केला. मात्र या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेच्या पदरात पुन्हा निराशाच आल्याची टीका विरोधक करत आहेत. ज्या योजनेच्या जोरावर निवडणूका जिंकल्या त्या लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देण्याबाबत कोणत्याही प्रकारची घोषणा या अर्थसंकल्पात केली गेली नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. सरकारला मोठे प्रोजेक्ट फक्त स्वत:च्या कामा पुरते आणायचे आहेत. कॉन्ट्रॅक्टरला पुढे आणून त्यातून मलिदा खायचा आहे. पैसा घ्यायचा आहे. बाकी काहीही करायचं नाही, अशी टीका रोहित पवार यांनी यावेळी केली.

विधान भवन परिसरात रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारच्या कामापुरत्या वापरात आणलेल्या योजनांचा पाढा वाचला. अजित दादा अर्थसंकल्प सादर करताना लाडक्या बहि‍णींबाबत काहीही बोलले नाही. यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरही त्यांनी दुजोरा दिला नाही. पण अजित दादांनी निवडणुकीपूर्वी गुलाबी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. यामध्ये आम्ही लाडक्या बहि‍णींच्या योजनेची किंमत वाढवून ती 2100 रुपये करू असं लिहिलेलं आहे, असे ते म्हणाले.

जाहीरनामा करत असताना त्यात दादांच स्वत: लक्ष होतं की नाही माहित नाही. पण अदिती तटकरे ताई आणि त्यांचे वडील सुनील तटकरे हे यात सहभागी होते. आमच्या लाडक्या बहि‍णींना देणार 2100 रूपयांची वाढ असं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे भाजपच्या जाहीरनाम्यातही हा विषय आहेच. याचसोबत अमित शहा यांच्या उपस्थितीतीतही जाहीरनामा जाहीर करत असताना आम्ही लगेचच आमच्या लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये करू असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र यावर अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची घोषणा झालेली नाही.

आता काही लोकं म्हणतात, चादर बघून पाय पसरायचे असतात, काही लोकं म्हणतात तो निधी जर आपण थांबवला तर बरीच कामं आपल्याला करता येतील… सरकारला हेचं करायचं आहे. सरकारला मोठे प्रोजेक्ट फक्त कामापुरते आणायचे आहेत. कॉन्ट्रॅक्टरला पुढे आणून त्यातून मलिदा खायचाय. पैसा घ्यायचा, बाकी काहीही करायचं नाही. गरीबाच्या बाबतीतही शब्द फिरवताना आपल्याला या अधिवेशनात हे सगळे नेते दिसले आहेत, असे म्हणत महायुती सरकारचा पर्दाफाश केला.