
महायुती सरकार 20 लाख लाडक्या बहिणींना वगळणार योजनेतून वगळणार आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या 8 लाख महिलांना आता लाडक्या बहिणी योजनेचे 1500 ऐवजी फक्त 500 रुपये मिळणार आहे. यावरच भाष्य करताना X वर एक पोस्ट करत ते असं म्हणले आहेत.
X वर केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले आहेत की, “राज्यातल्या 8 लाख लाडक्या बहिणींना कृषी सन्मान योजनेचे कारण देत 1500 रुपयांऐवजी 500 रुपये देण्याचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींची सरकारने केलेली फसवणूकच म्हणावी लागेल. नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजनेचा उद्देश वेगवेगळा असल्याने सरकार या दोन्ही योजनांची सरमिसळ करत असेल तर सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न पडतो.”
रोहित पवार म्हणाले की, “मुळात वर्षाला 2400 कोटी रुपये वाचावेत म्हणून सरकार 20 लाख लाडक्या बहिणींना वगळणार आहे, एकाच वेळी वगळल्यास राज्यात संतापाची लाट उसळेल म्हणून टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणींना वगळण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे.”
ते म्हणाले, “गेल्या अधिवेशनात महिला व बालविकासमंत्र्यांनी लाडकी बहीण आणि नमो सन्मान योजना या दोन्ही योजनांचे लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणीची संख्या 6 लाख सांगितली होती. तर आता एकाच महिन्यात ही संख्या 8 लाखापर्यंत कशी वाढली? महिला बालविकास मंत्र्यांनी सभागृहाला चुकीची माहिती का दिली? याची उत्तरे सरकारला द्यावी लागतील.”