जबाबदारी राज्य सरकारकडे अन् शिव्या मी खातोय, मुंबई-पुणे, कल्याण-नगर रस्ते तीन महिन्यांत दुरुस्त करा; नितीन गडकरी यांचा राज्य सरकारला इशारा

राज्य सरकारची जबाबदारी असलेल्या मुंबई-पुणे आणि कल्याण-नगर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ते आमचे, या रस्त्यांचे काम महाराष्ट्र सरकारकडे आणि शंभर टक्के शिव्या मी खात आहे. त्यामुळे राज्य सरकारला नोटीस द्या. तीन महिन्यांच्या आत हे रस्ते दुरुस्त नाही झाले तर करार रद्द करा व रस्ते आपल्या ताब्यात घ्या असे मी अधिकाऱ्यांना सांगितले आहे, असा इशारा केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला दिला.

पालखी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील दिवे घाट ते हडपसर रस्त्याचे चौपदरीकरण, सिंहगड रस्ता ते वारजे सेवा रस्ते आणि मुळा-मुठा नदीवरील पुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य महाव्यवस्थापक अंशुमाली श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम यावेळी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, महाराष्ट्र सरकारने आमच्याकडून दोन रस्ते घेतले आहेत. एनएच-4 या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होतात. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना एमएसआरडीसीचे मॅनेजिंग डायरेक्टर करंदीकर माझ्याकडे आले होते. मुंबई-पुणे रस्ता हा नुकसानीत असल्याचे सांगत यातून मार्ग काढण्यासाठी शरद पवार यांनी मला तुमच्याकडे पाठवल्याचे करंदीकर यांनी मला सांगितले. त्यावेळी मी मंत्री नव्हतो. त्यामुळे ज्यांचे सरकार आहे, त्यांनाच बघू द्या, असे मी करंदीकर यांना सांगितले. त्यानंतर शरद पवार यांचा मला फोन आला. नितीन राज्यातले सरकार जरी बदले तरी मुंबई-पुणे एक्प्रेस वे हे तुझे अपत्य आहे, त्यासाठीचा उपाय तूच काढावा, असे शरद पवार यांनी मला सांगितले. नंतर मी जुना मुंबई-पुणे हायवे एमएसआरडीसीला हस्तांतरित केला. त्यासाठीच्या करारात रस्त्यावरील पूल त्यांनी बांधावे, रस्ता चांगला ठेवण्यासंदर्भातील अटी होत्या, मात्र त्यांनी तो रस्ता आठ हजार कोटींना विकून टाकला आणि ते कामच करत नाहीत. त्यामुळे तेथील आमदार आता माझ्याकडे तक्रारी घेऊन येत असल्याचे सांगत गडकरी यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली.

पुणे-मुंबई महामार्ग करताना माझी चूक झाली 

पुणे-मुंबई हा महामार्ग कात्रज ते मुंबई असा करण्याची कल्पना डोक्यात होती, मात्र काही अधिकारी म्हणाले यासाठीचा खर्च वाढेल. हे अधिकारी वय झाले की निवृत्त होतात. नवीन कपडा शिवण्याऐवजी जुन्याला रफू करणे ही त्यांची जीवनदृष्टी असते. त्यामुळे हा महामार्ग करताना माझी चूक झाली असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

सुप्रिया सुळेंनी भाजप कार्यकर्त्यांना ठणकावले

या भूमिपूजन कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे या भाषणासाठी उभ्या राहताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या काही कार्यकत्यांनी सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी सुळे यांनी कार्यकर्त्यांना घोषणाबाजी थांबवायला लावत आपण इथे पक्षासाठी नाही तर नितीन गडकरी यांचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. तसेच यावर मी उत्तर देऊ शकते, पण मी देणार नाही, असेही त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ठणकावले.