जनतेला फसवून त्यांची मते मिळवणाऱ्यांची रामाचे नाव घेण्याची पात्रता नाही; उद्धव ठाकरे कडाडले

काळ झपाट्याने बदलत आहे. या बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञान जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करत अनेकांची फसवणुकही होत आहे. याबाबत जनतेत जागृती करण्यासाठी आणि अशा गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुढाकार घेतला आहे. हे काम आता शिवसंचार सेनेकडून होणार आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यांच्याहस्ते शिवसंचारच्या लोगोचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला. आज भाजपचा स्थापना दिवस असल्याचे पत्रकारांनी सांगितले, त्यावर ते म्हणाले की, रामनवमी हा भाजपचा स्थापना दिवस असेल तर त्यांनी श्रीरामाप्रमाणे सत्याने,न्यायाने वागण्याचा प्रयत्न करावा, अशा आपल्या शुभेच्छा त्यांना आहे. मात्र, हा भाजपचा वर्धापनदिन तारखेप्रमाणे, तिथीप्रमाणे आहे की सोयीप्रमाणे आहे, असा सवाल करत त्यांनी भाजपला जबरदस्त टोला लगावला.

वक्फ सुधारणा विधेयकावर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. या मुद्द्यावर आम्ही न्यायालायात जाणार नाही. मात्र, काँग्रेस आणि इतर पक्ष न्यायालयात दाद मागणार आहेत. याबाबत आम्ही आता भूमिका स्पष्ट केली आहे. आपण पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावर अधिक बोलण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले.

निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने लाडकी बहीण योजना आणली, लाडक्या बहिणींचे पैसे वाढवू असे सांगितले होते. शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आता त्यांना प्राण जाय पर वचन न जाये, याची आठवण करून देण्याची गरज आहे. त्यांनी जनतेला फसवून मते घेतली हे आता उघड झाले आहेत. रामाचे नाव घेण्याची त्यांची पात्रता नाही. कोकाटे यांच्यावर फसवणुकीचा आरोप असून गुन्हा सिद्ध झाला आहे. गुन्हा सिद्ध होऊनही शिक्षा न झालेले ते पहिलेच व्यक्ती असतील.

भाजपला कोणत्याही समुदायाबाबत आस्था, आपुलकी नाही. फक्त व्यापार हेच त्यांचे धोरण आहे. जमिनी, उद्योगधंदे पळवून आपल्या मित्रांना फायदा होईल, असेच कामे ते करत आहेत. वक्फकडे असलेली जमीन काढून घ्यायची आणि आपल्या मित्रांना द्यायची. आता ख्रिश्चन समुदायाची जमीन काढून ते मित्रांना देतील. आता या दिशेने त्यांची पावले पडत आहेत. त्यानंतर गुरुद्वारा, जैन समाज आणि इतर समुदायाच्या जमिनीही ते काढून घेतील. सर्वांची जमीन काढून त्यांना त्यांच्या मित्रांना द्यायची आहे, हे स्पष्ट होत आहे. आता वक्फच्या जमिनीपासून त्यांनी सुरूवात केली आहे. सर्व समुदायांच्या जमिनी हडपण्याचा त्यांचा डाव आहे. हे आम्ही आधीच सांगितले होते. आता ऑर्गनाझरनेही यावर शिक्कामोर्तब केले आहे, असेही ते म्हणाले.

समाजासमाजात तेढ पसरवण्याचे काम भाजप करत आहे. भाजप देशात धर्मांधतेचं विष पसरवत आहे. ते विष देशाला भारी पडणार आहे. त्यामुळे आताच जातीधर्मांचा विचार दूर करत असे विष पसरवणाऱ्यांना दूर केले पाहिजे. सर्व देशाने जातीभेद विसरत एकत्र येत वेळीच जागे होत ही विषवल्ली पसरवणाऱ्यांना दूर करण्याची गरज आहे, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.