कथा चवींची -आनंदाचा फराळ

>> रश्मी वारंग

दिवाळी सण आणि फराळ यांचं अतूट नातं आहे. फराळाच्या ताटात चकली, चिवडा, लाडू, करंजी नेहमीच भाव खाऊन जातात, पण त्याबरोबरच इतरही असे अनेक पदार्थ आहेत, ज्यांच्याशिवाय फराळाला पूर्णता नाही. त्याच तिखट गोड फराळाची ही खमंग गोष्ट.

फराळ म्हटला की, काही पदार्थ अनिवार्य असतात. मात्र काही घरात होतो, काही घरात होत नाही असा फराळाचा पदार्थ म्हणजे शंकरपाळी. या नावापासूनच पदार्थाविषयी कुतूहल निर्माण होतं. शंकराच्या पाळीचा आणि या पदार्थाचा संबंध काय? असा प्रश्न पडतो. पर्शियन पदार्थ ‘शक्करपारा’चा अपभ्रंश होऊन ‘शंकरपाळी’ हा शब्द तयार झाला असे अनेक खाद्य अभ्यासकांचे म्हणणे आहे. मात्र हिंदुस्थानी खाद्य संस्कृतीकडे लक्ष दिल्यास सोमेश्वराच्या ‘मानसोल्लासा’त ‘शंखपाल’ नावाच्या पदार्थाचा उल्लेख होतो. तो पदार्थ म्हणजेच शंकरपाळीचा पूर्वज. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशमध्येसुद्धा शंकरपाळी लोकप्रिय आहे. हिंदुस्थानभरात ती शक्करपारा, मुरली आणि उत्तर प्रदेशात ‘खुर्मा’, ‘लख्तो’ या नावांनी चवीने खाल्ली जाते. शंकरपाळी बनवणं म्हटलं तर सोपं आणि म्हटलं तर कठीण काम. अतिशय कमी घटकांसह शंकरपाळी तयार करता येते. मात्र ती योग्य प्रमाणात खुसखुशीत होणं, तोंडात टाकताच विरघळणं हे सगळं कौशल्याचं काम.

काही पदार्थ म्हणजे स्त्रियांच्या पाक कौशल्याची परीक्षा पाहणारे. अशा पदार्थांमधला एक म्हणजे लवंग लतिका. मधला एक काळ पाककला पुस्तकांमध्ये विविध पाककृती पाहून ते स्वयंपाकघरात करून पाहण्याचा होता. अशा काळामध्ये विविध प्रांतांतले पदार्थ घरी बनवून पाहणाऱया स्त्रियांचे प्रमाण मोठे होतं. त्यादरम्यानच ‘लवंग लतिका’ हा बिहारी, बंगाली पदार्थ महाराष्ट्राच्या स्वयंपाकघरात पाहुणा म्हणून आला. बनारस भागामध्ये 500 वर्षांपासून ‘लवंग लतिका’ हा पदार्थ बनतो असे उल्लेख आढळतात.

फराळाच्या पदार्थांमध्ये सुगरणपणाची परीक्षा पाहणारा पदार्थ म्हणजे अनारसा. या शब्दाचे मूळ संस्कृतमध्ये आहे. ‘अनरशा’ म्हणजे ‘कोणतीही भेसळ नसलेला’ किंवा ‘शाश्वत’ असा होतो. ‘अनरशा’ हा शब्द शुद्धता, कालातीतपणा आणि क्षय नसणेदेखील सूचित करतो. लक्ष्मीपूजेच्या नैवेद्यामध्ये अनारसे दाखवण्याची पद्धत काही घरांमध्ये आहे. तांदूळ, गूळ, तूप आणि खसखस इतक्या ऐवजांवर अनारसा बनतो.
असाच विस्मृतीत गेलेला पदार्थ म्हणजे चिरोटे. महाराष्ट्रासह कर्नाटकमध्येसुद्धा चिरोटे आवडीने बनवले आणि खाल्ले जातात. तेलंगणामध्ये ‘चिरोटे फेणी’, ‘पेनी’ या नावांनी खाल्ले जातात. गुप्त वंशानंतरच्या काळात चिरोटय़ासारख्या एका पदार्थाला ‘पत्रिका’ म्हटले आहे.

अलीकडच्या काळात रेडीमेड फराळाची संस्कृती रुजत असताना जिथे फराळाचे पदार्थच जेमतेम घरात बनतात, तिथे फारसे परिचित नसलेले पदार्थ हळूहळू लोप पावणं स्वाभाविक आहे. गजानन महाराजांच्या पोथीमध्ये उल्लेख असलेला कान्होले हा पदार्थ असाच. खान्देशमध्ये कान्होले लोकप्रिय आहेत. फार कमी जिन्नसांमध्ये हा पदार्थ बनतो. गव्हाची पिठी आणि रवा अर्धा-अर्धा घेऊन त्याची पारी बनवली जाते. नंतर समोशासारखा त्रिकोण बनवून त्यात सारण भरून हे कान्होले तळले जातात.

असे अनेक पदार्थ काळाच्या ओघात दिवाळीमध्ये हळूहळू विस्मृतीत जात आहेत. अर्थात त्यांच्या जागी येणारे नवे पदार्थ ही भविष्यातली खाद्य संस्कृती असेल. दिवाळीच्या फराळाचा अर्थ उमगून घेणं इथे महत्त्वाचं ठरतं. दिवाळी नेमक्या अशा टप्प्यावर येते जिथे शेतकऱयाने राबून केलेल्या कष्टाचं फळ धान्य रूपातून घरी येत असतं. पावसाळ्यात शेतीसाठी राब राब राबणाऱया शेतकऱयांना स्वतच्या शरीराचे लाड पुरवण्यासाठी उसंत असते. थकलेल्या शरीराला काही पौष्टिक द्यावे, येणाऱया थंडीसाठी शरीरात स्निग्धता साठवावी या हेतूने दीपावलीशी फराळ जोडला गेला आहे. हा हेतू साध्य करणारे सर्वच पदार्थ दिवाळीच्या फराळाचा भाग होऊ शकतात.

लाडू, करंजी, चकली, शेव, चिवडा यांनी भरलेलं ताट असावं. हे सारे पदार्थ चवीने खाणारे पाहुणे यावेत. कंदिलाचा प्रकाश, फटाक्यांची आतषबाजी, नवीन कपडय़ांचा सुगंध आणि दिव्यांचा प्रकाश या वातावरणात या पदार्थांचा स्वाद घेताना पुरेपूर जाणवावं…
‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’!