
महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व’ या ग्रंथाचे प्रकाशन 29 जुलै रोजी विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात करण्यात येणार आहे. यावेळी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांतील निवड केलेल्या सन्माननीय सदस्यांना ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या समारंभाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आदींची प्रमुख उपस्थिती असेल. विधान भवनात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली.
सन 1921 ते 2021 हा महाराष्ट्र विधान परिषदेचा शतक महोत्सवी वाटचालीचा कालखंड आहे. त्यानिमित्त कार्यवृत्तामधून महत्त्वाच्या संदर्भांची निवड करत वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व, विधान परिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे, विधान परिषदेतील विविध विषयांवरील महत्त्वपूर्ण चर्चा आणि शंभर वर्षे, शंभर भाषणे… अशा चार ग्रंथांची निर्मिती करण्यात आली आहे.