Chandrapur News : ‘विकासपुरुषा’च्या जिल्ह्यात शाळांची दूरवस्था, नागरिकांमध्ये नाराजी

>> अभिषेक भटपल्लीवार

शाळा आणि महाविद्यालये नियमित सुरू झाली आहेत. मात्र जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयात दिसण्याऐवजी विद्यार्थी आंदोलने, निवेदने देण्यासाठी धावाधाव करताना दिसत आहेत. याला कारणही तसेच आहे. विद्यार्थ्यांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष द्यायला नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी आणि शिक्षण विभागाला वेळ नाही. शाळांची परिस्थिती तर भयावह झाली आहे. शाळांच्या इमारती जीर्ण होत चालल्या आहेत. शाळांमध्ये शिक्षक नाहीत, सरपरटणाऱ्या प्राण्यांचा वावर अशा एक ना अनेक समस्या विद्यार्थ्यांसमोर उभ्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहेत.

शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यास कुणालाच स्वारस्य नाही. स्वतःला ‘विकासपुरुष’ म्हणवणारे नेतेही शाळांच्या दुरवस्थेकडे कानाडोळा करत आहेत. मोठमोठ्या इमारती बांधण्यात धन्यता मानणाऱ्या ‘विकासपुरुषा’ला ग्रामीण भागातील शाळांच्या समस्या सोडवण्यास रस नाही. यामुळे विकासपुरुषाबाबत ग्रामीण नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. हे ही थोडे नव्हते की शाळेपर्यंत पोहचायचे कसे हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. एसटी बस असूनही विद्यार्थ्यांना फारसा उपयोग होत नाही. एसटी बसमध्ये अनेकदा गर्दी असल्याने विद्यार्थ्यांना गाडीतून उतरवले जाते. त्यामुळे विद्यार्थी शाळेत पोहोचू शकत नसल्याने त्यांच्या शिक्षणावर याचा गंभीर परिणाम होत आहे.

पुरोगामी महाराष्ट्राचा डंका मिरवणाऱ्या लोकप्रतिनिधींना स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यातच स्वारस्य आहे. पण शाळांची दुरवस्था आणि आपल्या पाल्यांची होत असलेली फरफट पाहता पालक चिंताग्रस्त झाले आहेत. अनेक शाळेत शिक्षक नाहीत. जेथे शिक्षक आहेत ते वेळेवर येत नाहीत. शिक्षक गावात न राहता तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणावरून ये-जा करतात. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक वर्गात आले तरी मोबाईलमध्ये गुंतून असतात. शिक्षकांवर कुणाचाही वचक नाही. यामुळे जिल्ह्यातील गरिबांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे.

जिल्ह्यात अनेक शाळांच्या इमारती जीर्ण अवस्थेत आहे. विद्यार्थांना एका खोलीत, सभागृहात एकत्र बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. अनेक शाळा घाणीने व्यापल्या आहेत. शाळांचे रस्ते चिखलाने माखले आहेत. विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी नाही. वारंवार सूचना करूनही यात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे पालक संतापले आहेत. शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे अनेक शाळांना संतप्त पालकांनी कुलूप ठोकल्याच्या घटना घडल्या आहेत.

जिल्ह्यातील पहिल्या मुलींच्या शाळेत दारूच्या बाटल्यांचा खच

कधीकाळी शिक्षणाचे माहेरघर असलेली जिल्ह्यातील पहिली मुलीची शाळा आता दारुड्यांचा अड्डा बनली आहे. गोंडपीपरी तालुक्यातील धाबा गावात ही जिल्हा परिषदेची पहिली मुलींची शाळा आहे. पण या शाळेची आता भयावह अवस्था झालेली आहे. शाळेच्या परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आणि खर्रा खाऊन पिचकाऱ्या मारलेल्या दिसत आहेत. शाळा भरायच्या आधी आणि सुटल्यानंतर येथे दारुड्यांचा वावर असतो. शाळेच्या परिसरातील हे चित्र पाहून पालकांनी संताप व्यक्त केला आहे.