मुंबईकरांचा श्वास विषारी! वाढलेल्या खासगी वाहनांनी मुंबईची वाट लावली; ग्रीनपीस इंडियाचा अहवाल

बांधकामाची धूळ आणि धुरक्यामुळे मुंबईची हवा आधीच प्रदूषित झाली असताना आता वाढलेल्या खासगी वाहनांच्या संख्येमुळे मुंबईकरांच्या नाकातोंडात इंधनातून बाहेर पडणारा नायट्रोजन डायऑक्साईड (एनओटू) हा अत्यंत विषारी वायू जात आहे. या वायूमुळे मुंबईची हवा अधिक प्रदूषित झाली आहे, असा निष्कर्ष ग्रीनपीस इंडिया या संस्थेने अहवालातून काढला आहे. ‘उत्तर हिंदुस्थानच्या पलीकडे हिंदुस्थानातील सात प्रमुख शहरांमध्ये ‘एनओटू’चे प्रदूषण आणि आरोग्यविषयक धोके’ या नावाचा हा अहवाल आहे.

हवेत ‘एनओटू’ची पातळी कितपत असायला हवी, याची मर्यादा जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांमध्ये घालून दिलेली आहे. मुंबईतील 24पैकी 22 ‘कंटिन्युअस अम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन्स’मध्ये (सीएएक्यूएमएस) ‘एनओटू’च्या वार्षिक सरासरी आकडेवारीने 2023मध्ये ओलांडली. माझगाव येथे ‘एनओटू’ची सर्वाधिक पातळी नोंदवली गेली. त्या खालोखालची पातळी वांद्रे-कुर्ला येथील बस डेपोजवळील रस्त्यालगतच्या स्थानकामध्ये नोंदवली गेली. माझगाव आणि सायन येथे वर्षभराच्या 70 टक्क्यांपेक्षा जास्तीची मर्यादा ओलांडली.

काय आहे एनओटू

नायट्रोजन डायऑक्साईड (एनओटू) हा एक अदृश्य स्वरूपाचा विषारी वायू आहे. वाहनांच्या वाढत्या रहदारीमुळे, इंधनाच्या ज्वलनामुळे तो उत्पन्न होतो. शहरी भागांत त्याचे प्रमाण जास्त असते.

एनओटूचे दुष्परिणाम

‘नायट्रोजन डायऑक्साईड’चे प्रमाण हवेत जास्त झाल्यास अस्थमा, श्वासनलिकेला सूज येणे, श्वास घेताना त्रास होणे, फुफ्फुसांचे कार्य बिघडते, तीव्र स्वरुपाची ऍलर्जी, हृदयविकार, फुफ्फुसाचा कर्करोग आणि श्वसनकार्य थांबल्याने मृत्यूही येऊ शकतो.

  • खासगी वाहनांची वाढत्या संख्येमुळे हवेची गुणवत्ता बिघडते. आरोग्यही त्यामुळे धोक्यात येते. यावर मात करण्यासाठी शाश्वत, कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे वळायला हवे, असे ग्रीनपीसच्या ‘क्लायमेट जस्टीस कॅम्पेनर’ सेलोमी गार्नियाक यांनी म्हटले आहे.
  • लहान मुलांना या वाढत्या ‘एनओटू’चा सर्वाधिक त्रास होतो. मुंबईत 2015मध्ये आढळलेल्या बालदम्याची
    3 हजार 970 प्रकरणे ‘एनओटू’मुळे झाल्याचा अंदाज आहे.