
अंतिम लढतीत न्यूझीलंडचा पराभव करत हिंदुस्थानने तब्बल एक तपानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. या विजयानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे, तर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजक असलेल्या पाकिस्तानवर मात्र शोककळा पसरली आहे. दुसरीकडे पाकिस्तानी खेळाडू मात्र हिंदुस्थानवर स्तुतिसुमने उधळत असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे जाहीर वाभाडे काढत आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याने पाकिस्तान क्रिकेट आयसीयूमध्ये असल्याचे म्हणत पीसीबीला घरचा आहेर दिला आहे.
आगामी टी-20 मालिकेसाठी शादाब खान याची पाकिस्तानच्या संघात निवड करणअयात आली आहे. गतवर्षी झालेल्या टी-20 वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच त्याला संघात स्थान मिळाले आहे. याचाच उल्लेख करत शाहिद आफ्रिदी याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा समाचार घेतला. त्याला (शादाब) कोणत्या आधारावर संघात स्थान देण्यात आले आहे? देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने असे काय दिवे लावले ज्यामुळे त्याची पुन्हा निवड करण्यात आली? असा सवाल आफ्रिदीने केला.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये फक्त चेहरे बदलतात, पण परिस्थिती बदलत नाही. पीसीबीचे प्रत्येक अध्यक्षांना असे वाटते की आपण या गोष्टी बदलू शकतो आणि ते बदलतातही. मात्र हे पाकिस्तान क्रिकेटच्या प्रगतीसाठी हानिकारक आहे, असेही तो म्हणाला.
प्रत्येक वेळी आपण तयारीबाबत बोलतो. जेव्हा एखादी मोठी स्पर्धा येते तेव्हा आपण अपयशी ठरतो, तेव्हा आपण त्यावर इलाज काय अशी चर्चा करतो. पण खरे तर हे आहे की आपल्या चुकीच्या निर्णयामुळे आज पाकिस्तान क्रिकेट आयसीयूमध्ये पोहोचले आहे, असेही आफ्रिदी म्हणाला. तसेच कोच आणि कर्णधाराच्या डोक्यावर नेहमीच टांगती तलवार असेल तर क्रिकेट बदलेल कसे असेही तो म्हणाला.