Pahalgam Terror Attack – इन्टेलिजन्स फेल्युअर आहे हे सरळ दिसतंय; शरद पवार यांची केंद्रावर टीका

काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याने देशभरात आक्रोश आणि संताप आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे. पहलगाममधील हल्ला इन्टेलिजन्स फेल्युअर आहे हे सरळ दिसत आहे, असे म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. कोल्हापूरमध्ये आज शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली.

काश्मीरमध्ये जे झाले त्या प्रश्नाकडे सगळ्या देशवासीयांनी एका विचाराने सरकारसोबत राहिले पाहिजे, इथं राजकारण आणायचं नाही. अतिरेक्यांनी जी अॅक्शन घेतली ती हिंदुस्थानच्या विरोधातील आहे. देशाच्या विरुद्ध असं कोणी निर्णय घेतं तिथं राजकारण करायचं नसतं. त्या दृष्टीने आम्ही लक्ष घातलं. सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्यामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, असे शरद पवार यांनी म्हणाले.

निशिकांत दुबे यांच्या गुलमर्गमधील हाय-प्रोफाइल पार्टीची चर्चा! पहलगाम हल्ल्याआधी कडक सुरक्षेत पार पडला कार्यक्रम

सरकारने हे अधिक गांभीर्याने घ्यायला पाहिजे. गेले काही दिवस सरकारच्या वतीने सतत सांगितले जात होते. आम्ही दहशतवाद मोडून काढलाय. आता काय चिंता नाही. असं होत असेल तर आनंद आहे. पण घडलेली घटना बघितल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे, हे स्पष्ट आहे. ही कमतरता सरकारने दूर करायला हवी. सरकारने अधिक गांभीर्याने घ्यावे. कमतरता आहे हे मान्य करत असेल तर सरकारने तातडीने पावले टाकावीत. आणि त्याही कामात आमचं सहकार्य सरकारला राहील, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आपापल्या राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार करा, केंद्राचे राज्य सरकारांना आदेश

इन्टेलिजन्स फेल्युअर आहे हे सरळ दिसत आहे. पहलगाम हे त्यातल्या त्यात अधिक सुरक्षित आहे. दोन-तीन महिन्यापूर्वीच मी तिथे जाऊन आलो. सातत्याने आपले लोक तिथे जातात. दहशतवाद्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केले, हा जो निष्कर्ष काढला जातो, तो अधिक सावधान करणारा आहे. आपण काळजी घ्यायला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले. तर पर्यटकांना हिंदू आहेत म्हणून गोळ्या घातल्या यामध्ये काय सत्य आहे? याबाबत मला माहिती नाही. पण तिथं जी लोक होते, त्यातील स्त्रियांना सोडले असे दिसते आहे. मी एका भगिनीच्या घरी गेलो होतो, त्यावेळी त्यांनी सांगितले आम्हा महिलांना हात लावले नाही. दहशतवाद्यांनी फक्त आमच्या पुरुषांना हात लावला, असे शरद पवार यांनी सांगितले. यापूर्वीही अतिरेक्यांनी हल्ले केले. पुलवामात हल्ला केला. या आधी तीन-चार ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ला केला. तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही. आज का होतेय. घडलं ते वाईट आहे. आव्हान आहे देशाला. सक्तीने तोंड द्यावं लागेल. पण त्या निमित्ताने धार्मिक अडसर येण्याचं काम करू नये, असे शरद पवार म्हणाले.

काश्मीरच्या लोकांचे चरितार्थ हे पर्यटनावर आहे. लोक काही दिवस काश्मीरला जाणार नाहीत असेच दिसते. त्यामुळे काश्मीरच्या जनतेचं मोठे नुकसान होईल. पण एक जमेची बाजू घडली आहे, ज्यामध्ये लोक रस्त्यावर उतरले आणि ते हिंदुस्थानच्या बाजूने उभे राहिले, असे शरद पवार पुढे म्हणाले.