
ज्या जोडप्याने पालकांच्या इच्छेविरोधात जाऊन लग्न केले असेल त्यांनी पोलीस संरक्षण मागू नये असे मत अलाहबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. जर त्यांना खरंच त्यांच्या पालकांकडून जिवाचा धोका असेल तरच त्यांनी संरक्षण मागावे असेही कोर्टाने म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये श्रेया केसवाणी या तरुणीने आपल्या पालकांच्या इच्छेविरोधात जाऊन आपल्या प्रियकराशी लग्न केलं होतं. आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे अशी तिची मागणी होती. तेव्हा न्यायाधीश सौरभ श्रीवास्तव म्हणाले की ज्या जोडप्यांना धोका असेल अशा जोडप्यांना पोलीस सुरक्षा देणे गरजेचे आहे. पण ज्या जोडप्यांना कुठलाही धोका नाही त्यांनी एकमेकांना साथ देणे आणि समाजाला तोंड देणं शिकलं पाहिजे.
या केसमध्ये जोडप्यांना त्यांचे पालक किंवा त्यांच्या कुठल्याही नातेवाईकाकडून कुठलाही शारिरीक किंवा मानसिक धोका नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. तसेच याचिकाकर्त्यांनी या प्रकरणी आपल्या जिवाला धोका आहे म्हणून पोलिसांत धाव घेतली नाही आणि त्याचे कुठलेही कागदपत्र सादर केलेले नाही.