दर्शनाला चाललेल्या कुटुंबाच्या रिक्षाला ट्रकची धडक, अपघातात 9 जणांचा मृत्यू

ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. एक महिला गंभीर जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. मध्य प्रदेशातील दमोहच्या समन्ना येथे मंगळवारी ही दुर्घटना घडली. पीडित कुटुंब दमोहहून बांदकपूर येथे दर्शनासाठी चालले होते. मात्र वाटेतच काळाने त्यांच्यावर झडप घातली.

दमोह येथील गुप्ता कुटुंबीय मंगळवारी बांदकपूर येथे दर्शनासाठी रिक्षातून चालले होते. रिक्षात गुप्ता कुटुंबातील एकूण 10 जण होते. मात्र बांदकपूरला पोहचण्याआधीच समन्नाजवळ भरधाव ट्रकने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा चक्काचूर झाला. तर रिक्षात बसलेल्या गुप्ता कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना जबलपूर मेडिकल कॉलेजमध्ये नेत असताना एकाचा वाटेतच मृत्यू झाला. तर एक बालक आणि महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु होते. यापैकी बालकाचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

परिवहन अधिकाऱ्यांनी सदर ट्रकचे फिटनेस व परमिट रद्द केले आहे. घटनेनंतर दमोहचे जिल्हाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर आले असून रात्रीपासून वाहनांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सर्व कागदपत्रांची पूर्तता नसल्यास वाहने जप्त करण्यात येत आहेत. मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.