काही जण बळजबरीने आपले विचार देशावर लादत आहेत… काँग्रेसचा केंद्र सरकारवर निशाणा

आज 15 ऑगस्ट, 2024 रोजी संपूर्ण देश आपला स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. आजपासून 78 वर्षांपूर्वी 15 ऑगस्ट 1947 रोजी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले होते. ब्रिटिशांच्या तावडीतून भारतमातेला मुक्त करण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहूती दिली. त्यामुळे आज संपूर्ण देश अगदी उत्साहात स्वातंत्र्यदिवस साजरा करतोय. या दिवशी अनेक नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हा सर्वांना या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही आमच्या लाखो महान स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करतो आणि त्यांना आदरांजली अर्पण करतो. लोकशाही आणि संविधान हे आपल्या 140 कोटी हिंदुस्थानींचे सर्वात मोठे संरक्षण आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही त्याचे संरक्षण करू. असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. तसेच यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणाही साधला आहे.

‘विरोधक हा लोकशाहीचा प्राणवायू आहे. सरकारच्या असंवैधानिक वृत्तीला आळा घालण्याबरोबरच जनतेसाठी आवाज उठवतात. मात्र घटनात्मक संस्थांना सरकारने एक खेळणे समजले आहे. ही एक चिंतेची बाब आहे. विविधतेत एकता असावी हे आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न होते. मात्र काही जण बळजबरीने आपले विचार देशावर लादून आपला बंधुभाव नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे संविधानात दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जीवन, अन्न, वस्त्र, उपासना याविषयी आपली जागरूकता असणे गरजेचे आहे’, असे मत मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले.

‘आम्ही बेरोजगारी, महागाई, गरिबी, भ्रष्टाचार आणि विषमतेविरुद्ध नेहमीच लढत राहू. संविधानाच्या रक्षणासाठी वाटेत ते करायला आम्ही तयार आहोत.हीच आपल्या पूर्वजांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल’, असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त संपूर्ण देशाला दिले.