अनियंत्रित पिकअप वाहनाने 11 स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, 7 जणांचा मृत्यू; चौघे गंभीर

दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. अनियंत्रित पिकअप वाहनाने महामार्गावर काम करणाऱ्या 11 स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून पळून गेला. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे. हरियाणाच्या नूह जिल्ह्यात शनिवारी सकाळी ही घटना घडली.

दिल्ली-मुंबई महामार्गावरील फिरोजपूर झिरका सीमेजवळील इब्राहिमबास गावाजवळ हे सर्व कर्मचारी रस्त्याची सफाई करत होते. यादरम्यान भरधाव पिकअप वाहनाने या कर्मचाऱ्यांना चिरडले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत.