
नागपुरात सोमवारी दंगल उसळली होती. जमावाने अनेक गाड्यांना लक्ष्य करत तोडफोड केली होती. पोलिसांनी तातडीने पावलं उचलत परिस्थिती आटोक्यात आणली आहे. आता नागपुरातील अनेक भागात कर्फ्यू हटवला असून नवीन आदेश जारी केले आहेत. नागपूर पोलिसांनी नंदनवन आणि कपिल नगर भागात कर्फ्यू हटवले आहेत. तसेच लकडगंज, पाचपावली, शांती नगर, शक्करदारा, इमामवाडा भागात कर्फ्यू थोड्या प्रमाणात कमी केला आहे. नागपूरच्या कोतवाली,तहसिल, गणेश पेठ भागात अजूनही कर्फ्यू लागू आहे.
नागपुरात झालेल्या हिंसेची सायबर सेलने चौकशी केली आहे. या हिंसेमागे बांगलादेशचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बांगलादेशमधील एका फेसबुक अकांऊटवरून नागपुरात दंगली भडकावण्याचा इशारा देण्यात आला होता. एका बांगलादेशी युजरने ही पोस्ट केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलीस या फेसबुक अकांऊटचा तपास करत असून हे फेसबुक अकाऊंट कोण चालवत होतं याचा शोध घेत आहे.