मुरुडचा किनारा गाळाने भरला; बोटी समुद्रातच तासन्तास वेटिंगवर, भरतीलाच मासेमारी नौका किनाऱ्यावर

मुरुड किनाऱ्यावरील एकदरा खाडी अक्षरशः गाळाने भरली आहे. गेल्या नऊ वर्षांपासून खाडीतील गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे तासन्तास मच्छीमारांना भरसमुद्रात लटकावे लागते. परिणामी ओहोटीच्या वेळी मच्छीमार बोटींना किनाऱ्यावर ये-जा करणे अवघड झाले आहे. मोठ्या बोटींना बंदरात येण्यासाठी भरतीची प्रतीक्षा करावी लागते. मत्स्य विभागाच्या दुर्लक्षामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान होत आहे.

मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील एकदरा खाडीतील गाळ 2016 साली मत्स्य विभागाने काढला. त्या वेळी सात कोटी रुपये खर्च करण्यात आले. जवळपास तीन महिने गाळ काढण्याचे काम सुरू होते. हा गाळ विश्रामधाम किनारी टाकण्यात आला. एकदरा परिसरात 300 मासेमारीच्या बोटी आहेत. पहाटे ओहोटी असेल तर मासेमारी करण्यासाठी जाता येत नाही. त्यामुळे मच्छीमारांना खोरा बंदरात बोटी लावाव्या लागतात. खोरा बंदरात बोटी लागल्याने 15 दिवसांचे खाद्य, इंधन आणि जाळी घेऊन जाणे कठीण होते. खाडीतील गाळ लवकरात लवकर काढला तर मासेमारी बोटी घरासमोर लागतील आणि आमचा वेळही वाचेल असे मत मच्छीमारांनी व्यक्त केले.

खाडीकिनारी एकाच वेळी 150 ते 200 बोटी थांबू शकत नाहीत. किनाऱ्यापासून लांब बोटी नांगरल्यास मासळी उतरवताना मोठी कसरत करावी लागते. कोळी बांधवांना मानेपर्यंत पाण्यात उतरून मासे आणावे लागतात. अशावेळी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या खाडीतील गाळ काढल्यास मासेमारी बोटी किनाऱ्याला लागतील आणि मच्छीमारांचा मोठा वेळ वाचेल असे स्थानिकांनी सांगितले.

ग्रॉईन बंधारा धूळखात

खाडीतील गाळ काढून मुरुडकडे येण्याचा मार्ग मोठा करावा तसेच समुद्रातील वाळू पुन्हा येऊ नये म्हणून ग्रॉईन बंधारा बांधावा अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे. ग्रॉईन बंधाऱ्याचा प्रस्ताव गेल्या 25 वर्षांपासून धूळखात पडलेला आहे. त्या वेळी या बंधाऱ्यासाठी एक कोटीचा खर्च अपेक्षित होता. हा बंधारा बांधला तर बोटी किनाऱ्याला लागतील.

मुरुडच्या कोळी बांधवांना खोल समुद्रात ये-जा करण्याचा मार्ग अतिशय अरुंद आहे. पूर्वी मासे चांगले मिळत होते, परंतु हवामान बदलामुळे मासे मिळणे कठीण झाले आहे. त्यातच गाळामुळे बोटी अडकतात आणि कोळी बांधवांचे मोठे नुकसान होते. ग्रॉईन बंधारा बांधणे गरजेचे आहे.
■ मनोहर बैले, मच्छीमार