
मुंबईसह संपूर्ण राज्यात सूर्य आग ओकत असून उद्या 11 मार्चलाही उष्णतेची लाट येणार आहे. त्यामुळे पारा 40 अंश सेल्सिअस पार जाऊन प्रतिकारशक्ती कमी असलेल्या नागरिकांना उष्माघाताचा फटका बसू शकतो. त्यामुळे आजचा दिवस काळजी घ्यावी आणि उष्माघातापासून स्वतःचा बचाव करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
उष्णतेची लाट असताना नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत माहिती दिली आहे. यानुसार तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी प्या, हलके, सौम्य व फिक्या रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे घाला. उन्हात बाहेर जाताना संरक्षक गॉगल, छत्री / टोपी, बूट किंवा चप्पल वापरा, मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बेनेटेड शीतपेये (कोल्ड्रिंक्स) टाळा, कारण त्याद्वारे शरीराचे निर्जलीकरण होते. शिवाय उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका, पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका, ओआरएस, लस्सी, तोराणी (तांदूळ पाणी), लिंबू पाणी, ताक, नारळपाणी इत्यादी घरगुती पेये नियमितपणे प्या. यामुळे शरीराला पुन्हा ‘हायड्रेट’ करण्यास मदत होते, अशा सूचनाही केल्या आहेत. शिवाय जनावरांना सावलीत ठेवा आणि त्यांना भरपूर पाणी द्या, तुमचे घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडय़ा ठेवा, असे आवाहनही पालिकेने केले आहे.
उष्माघाताचा त्रास झाल्यास हे करा!
संबंधित व्यक्तीला थंड जागी, सावलीखाली ठेवा. तिला / त्याला ओल्या कपड्याने पुसून काढा / वारंवार शरीर धुवा. डोक्यावर सामान्य तापमानाचे पाणी घाला. मुख्य गोष्ट म्हणजे त्याच्या शरीराचे तापमान कमी होईल असे पहावे.
त्या व्यक्तीला ‘ओआरएस’ प्यायला द्या किंवा लिंबू सरबत / तोराणी किंवा जे काही शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण संतुलित (रिहायड्रेट) करण्यासाठी उपयुक्त आहे असे पेय द्या.
उष्माघात झाल्यास त्या व्यक्तीला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा. उष्माघात जीवघेणा ठरू शकतो म्हणून रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे.